महसूल मंत्री चंद्रकांत पाटील महाराष्ट्राचे नंबर दोनचे मंत्री आहेत. परंतु ते अक्कल गहाण ठेवून कर्नाटकात गेले आणि त्यांच कर्नाटकी प्रेम उफाळून आलयं. पाटील यांनी कन्नड अभिनेता राजकुमारचे गीत गायले. ‘हुट्टी दरे कन्नड नलली हुट्ट बेकू’ या गाण्याचे बोल आळवले. या गाण्याचा अर्थ जन्मले तर कर्नाटकमध्येच जन्मावे असा होतो. खरतर हा महाराष्ट्राचा अपमान आहे. महाराष्ट्रात जन्म घेतल्याची खंत बाळगणा-यांना महाराष्ट्राच्या मंत्रीमंडळात राहण्याचा नैतिक अधिकार नाही. थोर संतांची भूमी असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पुनित झालेल्या फुले, शाहू, आंबेडकरांच्या विचारांने धन्य झालेल्या कला, साहित्य, आर्थिक क्षेत्रात देशातील सर्वोच्च अशी कामगिरी करणा-या महाराष्ट्राचा अभिमान नसणारे हे कपाळकरंटेच आहेत. मराठी द्वेष्ट्यांच्या सहवासात जाऊन त्यांनी म्हटलेले गाणे संतापजनक असून ते सीमाभागातील मराठी बांधवाच्या भावनावर मीठ चोळणारे आणि निषेधार्ह आहे. त्यांनी हे गीत गायल्यामुळे महाराष्ट्र सीमा प्रश्ना बाबत किती त्यांना कितपत गांभीर्य आहे हे कळून चुकले आहे. नुकतेच कर्नाटकमधील एका मंत्र्यांने कर्नाटकच्या भूमीवर जय महाराष्ट्र म्हणून देणार नाही, असे म्हटले होते. परंतु चंद्रकांत पाटलांना कर्नाटक भूमीतच जन्म घ्यावा वाटतो हे दुर्देवी आहे. भाजप नेत्यांना महाराष्ट्र सोडून गुजरातसारख्या इतर राज्याच्या अभिमानाचा उमाळा अधून मधून येतच असतो. ज्या राज्यात निवडणुका असतील त्या राज्याचा आपल्याला किती अभिमान आहे हे दाखवण्याची स्पर्धाच भाजपात रंगलेली असते. चंद्रकांत पाटील यांनी अशाच स्पर्धेत कर्नाटकाचा अभिमान दाखवण्यासाठी संयुक्त महाराष्ट्रासाठी बलिदान दिलेल्या १०५ हुताम्यांचा अवमान केला आहे. मुख्यमंत्र्यांनी तात्काळ त्यांची मंत्रीमंडळातून हकालपट्टी करावी अशी मागणी सावंत यांनी केली. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी तसेच काँग्रेस,राष्ट्रवादी,शिवसेनेकडून त्याचा निषेध व्यक्त होत आहे आणि तो होणे साहजिक आहे. याच महाराष्ट्रातील मुंबईत स्वातंत्र्य चळवळीत देशाचे नेतृत्व करणा-या काँग्रेस पक्षाची स्थापना झाली. टिळक, गोखले, आगरकर यांच्यासारख्या अनेक स्वातंत्र्यसेनान्यांची कर्मभूमी असेलल्या याच महाराष्ट्रातून राष्ट्रपिता महात्मा गांधीजींनी चले जाव चा लढा सुरु केला आणि देशाला इंग्रजांच्या गुलामगिरीतून स्वातंत्र्य मिळवून दिले. पण स्वातंत्र्य चळवळीशी संबंध नसल्याने राज्यातील तमाम नागरिकांना अभिमानास्पद असलेल्या या वस्तुस्थितीचा अभिमान चंद्रकांत पाटलांना नाही. मराठी भाषा ,अस्मिता यासाठी झगडणाऱ्या सीमावासियांतून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. आणि त्या व्यक्त होणे साहजिक आहेत. कर्नाटकात विधानसभेची तयारी सुरु असताना भाजपचा प्रचार करण्यासाठीच पाटील यांनी जाणीवपूर्वक हे गीत गायला असून हा प्रकार संतापजनक आहे. महाराष्ट्राच्या मंत्रीपदावर असलेल्या व्यक्तीने असा फालतू प्रकार करणे संतापजनक आणि चीड निर्माँण करणारा आहे. अशा मंत्र्यांची हकालपट्टी करणे आवश्यक आहेत. परंतु भाजपा आपल्या मंत्र्यांना पाठिशी घालून मस्तवाल पणा करण्यासाठी रान मोकळे सोडते यामुळे मंत्री,नेते उठसुठ मनात आले ते विधान करतात. असले प्रकार लोकशाहीसाठी घातक आहेत.
वैदेही ताम्हण
मुख्य संपादक