सरकारला माझं एन्काऊंटर करायचं असून काही दिवसांपासून माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे,” असे आरोप विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष डॉ. प्रवीण तोगडिया यांनी केले. हिंदू राष्ट्र बनवण्याच्या बल्गना करणाऱ्या भाजपा सरकारच्या देशातच हिंदू खतरेमे असल्यावर शिक्कामोर्तब झाले. तोगडीया यांच्या आरोपामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह ही जोडी संशयाच्या भोवऱ्यात आली आहे. तोगडिया हे हिंदूत्ववादी नेते म्हणून गणले जातात तसेच मोदी आणि शाह हे सुध्दा हिंदुत्ववादी नेते आहेत. परंतु याच नेत्यांपासून आणि सरकार पासून तोगडिया यांच्या जीवाला धोका का निर्माण व्हावा आणि त्यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगण्याची वेळ का आली हा गंभीर विषय आहे. तोगडीया यांनी १९८४ पासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला सोड चिठ्ठी देऊन विश्व हिंदू परिषदेच्या कामाला सुरुवात केली होती. नेहमीच हिंदुत्वाच्या मुद्यावर रोखठोक आणि वादग्रस्त नेते म्हणून तोगडिया यांची ओळख आहे. गेल्या आठवड्यात पत्रकार परिषद घेऊन त्यांनी सांगितलं की, राम मंदिर निर्माण करण्यासाठी मोदी सरकारनं संसदेत एक विधेयक सादर करणं आवश्यक आहे. एकीकडे ते सरकारला या मुद्यांवर रोखठोक भूमिका घेण्यासाठी भाग पाडत आहेत. यामुळे सरकारच्या अडचणीत भर पडली आहे. पुढच्या वर्षी निवडणूका आहेत. केंद्रात सत्तेत असून राम मंदिर आणि कलम ३७० चा मुद्दा सरकार सोडवू शकली नाही. प्रखर हिंदुत्ववाद्यांकडून हा मुद्दा उपस्थित होणार आहे. यामुळे सरकारची भाजपाची मोठी गोची होईल ही भीती त्यांच्या मनात आहे. तोगडीया यांच्या आरोपामध्ये काही प्रमाणात तथ्य असू शकतात. सत्तेचा वापर कसाही केला जातो हे नुकतेच चार न्यायमूर्तींनी केलेल्या आरोपामुळे सिध्द होते. यामुळे तोगडीया बोलत आहेत की,त्यांना दंगली,तसेच इतर प्रकरणात नोटीसा पाठवून अटक वॉरंट काढले जात आहेत. त्यांना तुरुंगात डांबण्याची शक्यता आहे. विश्व हिंदू परिषदेच्या प्रमुख पदाच्या निवडणुकीसाठी जेव्हा त्यांनी निवडणूक लढवली, तेव्हा त्यांनी ही निवडणूक लढवू नये, असं संघ आणि भाजपमधील एका गटाला वाटत होतं. मात्र भुवनेश्वर इथल्या बैठकीत त्यांनी मोठं शक्ती प्रदर्शन केलं होतं. त्यानंतर त्यांना तीन वर्षांसाठी कार्यकारी प्रमुख बनवण्यात आलं. येथेही काही नेत्यांना तोगडीयांचे वर्चस्व खटकले. खरतर तोगडीया यांच्या वाढत्या वर्चस्वामुळे भाजपाच्या नेत्यांना ते आवडत नाहीत. तोगडीया यांच्याकडे २००२ च्या दंगलीची बरीच अंतर्गत माहिती आहे. तोगडीयांनी ती माहिती जगजाहीर केली तर त्यांचे शत्रु आपोआप नांग्या टाकतील. परंतु तोगडीया ती हिंमत करणार का? हा खरा प्रश्न आहे. परंतु सरकारच्या आणि विशेषत: मोदी आणि शहा या जोडीचे न्यायालयातील हस्तक्षेपा बद्दल चार न्यायमूर्तींनी थेट नाव न घेता आरोप केले त्यामध्ये शंभर टक्के सत्यता आहे. जर सरकार कोणत्याही गोष्टीत सत्तेचा वापर करुन दुरुपयोग करत असेल तर ते लोकशाहीसाठी घातकच आहे. मात्र स्वत:ला हिंदूत्ववादी म्हणणार या सरकारच्या काळातच डॉ. प्रवीण तोगडीया सारखे हिंदूत्ववादी नेते स्वत:ला असुरक्षित समजत असतील आणि “एन्काउंटर” ची त्यांनी भीती असेल तर मोदी सरकारचा खोटं हिंदुत्वाचा बरुखा २०१९ चया निवडणूकीत फाटू शकतो. हा त्याचाच इशारा तोगडीया यांच्या रुपाने देण्यात आला अस समजण गैर होणार नाही.
वैदेही ताम्हण
मुख्य संपादक