‘दलितांवर, होणाऱ्या अन्याय अत्याचाराविरोधात काँग्रेसने देशभरात जिल्हास्तरावर सोमवारी एक दिवशीय लाक्षणिक उपोषण केले. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राहुल गांधी स्वतः दिल्लीतील महात्मा गांधी यांच्या स्मृतीस्थळ राजघाटावर उपोषणास बसले होते. गोदी मीडियाने दिवसभर राहुल गांधी उशीरा पोहोचले. काँग्रेसच्या नेत्यांनी सकाळी छोले भटुरे खाल्ले नंतर उपोषणाला बसले. अशा प्रकारची पत्रकारीता केली. दलितांवर अत्याचारांमध्ये वाढ का झाली? कायद्याचा धाक का उरला नाही. याचा जाब सरकारला विचारायला हवा होता. गोदी मीडियाचा नेहमी प्रमाणे ‘डिबेट तमाशा’ रंगवुन स्वत:चा टाईमपास केला. देशभरात कुठे ना कुठे दलितांवरील अत्याचारांच्या घटना घडत आहेत. उत्तरप्रदेश मध्ये एका भाजपा आमदाराने एक दलित तरुणीवर अत्याचार करुन त्याच्या कुटुंबियाला जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्या तरुणीच्या वडीलांचा मृत्यू झाल्याची घटना आज उघडकीस आली. या साऱ्या घटना संशयास्पद आहेत. ‘धार्मिक अल्पसंख्यांक, तसेच दलितांना भारतात भेदभावाची वागणूक देण्यात येत असून, त्यांच्यावर अत्याचार होत आहेत’, असा दावा करणारा अहवाल नुकताच ‘अमेरिकी आंतरराष्ट्रीय धार्मिक स्वातंत्र्य आयोग’ या संस्थेने जाहीर केला होता. सन २०१४ पासून सक्तीच्या धर्मांतराच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाल्याचेही या अहवालात म्हटले होते. ‘भारतातील ढोबळ व वरवरचे कायदे, गुन्हेगारांना योग्य ती शिक्षा देण्यात कमी पडणारी यंत्रणा, न्यायव्यवस्थेतील सातत्याचा अभाव या सगळ्या गोष्टींमुळे धार्मिक अल्पसंख्यांक, तसेच दलितांवर भारतात अत्याचार होत आहेत. सन २०१४ नंतर, केंद्रात भारतीय जनता पक्षाचे सरकार आल्यानंतर विद्वेषपूर्ण गुन्हे, सामाजिक बहिष्कार, सक्तीचे धर्मातर या प्रकारांत कमालीची वाढ झाली आहे’, असे या अहवालात म्हटले होते. ‘भारत हा धार्मिक विविधता असलेला लोकशाही देश आहे. या देशाच्या राज्यघटनेने सर्व नागरिकांना–मग तो कुठल्याही धर्माचा असो–समानतेची ग्वाही दिलेली आहे. धर्माधारित भेदभाव राज्यघटनेस अमान्य आहे. मात्र प्रत्यक्षात आज चित्र वेगळेच दिसत आहे’, असे आयोगाचे प्रमुख अधिकारी थॉमस रीस म्हणाले होते. ‘भारतामधील वैविध्याच्या मूल्यापुढे अनेक राज्यांत मोठे आव्हान उभे राहिल्याचे गेल्या काही वर्षांत दिसून आले आहे.धार्मिक स्वातंत्र्याचे मूल्य पायदळी तुडवण्याच्या घटनांतही वाढ होत आहे. हे प्रकार रोखण्यासाठी केंद्र सरकार,तसेच राज्य सरकारांनी कायद्यांची कडक अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. परंतु आज परिस्थिती वेगळी आहे. गुन्हेगार हे सत्ताधारी आणि सत्ताधारींच्या पाठिंब्यामुळे बोकाळले आहेत. त्यांचा बंदोबस्त करण्याऐवजी त्यांना पाठिशी घातले जात आहे. गोदी मीडिया अत्याचाराच्या घटनांचा पर्दाफाश करण्याऐवजी त्या घटणांना दाबण्याचं काम करत आहे. मात्र दलित, आदीवासी, अल्पसंख्यांकांवरील अत्याचार थांबणे आवश्यक आहे. देशात सर्व समाजाचे, पंथांचे लोक गुण्यागोविंदाने कशा प्रकारे राहतील, त्यांच्यात ऐकापा कसा राहिल याची काळजी सरकारने घेणे आवश्यक आहे.
– वैदेही तामण
मुख्य संपादक