राज्यभर गाजलेल्या खर्डा (ता. जामखेड) येथील नितीन राजू आगे या अल्पवयीन दलित मुलाचा खुनाची घटना २८ एप्रिल २०१४ रोजी दुपारी १२ च्या सुमाराला घडली होती. या प्रकरणातील सर्व आरोपी गुरुवारी २३ नोव्हेंबर २०१७ रोजी निर्दोष सुटले. या खटल्यात एकूण २६ साक्षीदार तपासण्यात आले, त्यातील १६ साक्षीदार फितूर म्हणून जाहीर करण्यात आले. काही प्रत्यक्षदर्शी तर काही शाळेतील शिक्षक होते, असे सरकारी वकील यांनी सांगितले होते. साक्षीदार हे फितूर होतातच कसे? पोलिस यंत्रणेचा तपास या प्रकरणी संशयास्पद होता का? तेरा आरोपींना अटक करण्यात आली होती. त्यांना अटक का झाली. नितीन आगे प्रकरणात तर काही शिक्षकच प्रत्यक्षदर्शी होते. या प्रकरणातील प्रमुख आरोपीच्या बहिणीचे व इयत्ता १२ वीत शिकणाऱ्या नितीन आगे या तरुणाचे प्रेमसंबंध होते. दोघे एकाच म्हणजे खर्डा येथील न्यू इंग्लिश शाळेत शिकत होते. मुलीने नितीनलाच आपला पती करायचे असे सांगितले होते. त्याचा राग येऊन वरील आरोपींनी नितीनला मारहाण करत त्याचा गळा आवळून खून केला व त्याने आत्महत्या केली, असा बनाव तयार करण्यासाठी मृतदेह जवळच्याच कानिफनाथाच्या डोंगरावरील झाडाला लटकवला, अशी फिर्याद त्याचे वडील राजू नामदेव आगे यांनी दिली होती. मग आगे यांच्या वडिलांची तक्रार खोटी होती का? जर एक मुलाचा जीव जात असेल आणि आरोपींच्या विरोधात सबळ पुरावे सापडले नाहीत असे कारण पुढे करुन जर निर्दोष सुटका होत असेल तर हा एका प्रकारे मृतकाच्या कुटुंबियांवर अन्याय आहे. जे साक्षीदार तपासण्यात आले होते तो तपास खोटा होता का? असा प्रश्न उपस्थित राहतो. जर आरोपी निर्दोष होते तर त्यांना एवढ्या वर्ष तुरुंगात डांबून ठेवणे त्यांच्यावरही एका प्रकारे हा अन्याय झाला. खरतर या प्रकरणात नितीन आगे हा दलित होता की अजून कोण होता त्यापेक्षा तो कुणाचा तरी मुलगा होता. कुणाच्या घरातील एक सदस्य होता. एक मुलाचा जीव गेला. त्याने आत्महत्या केली की, त्याची हत्या झाली हे स्पष्ट झाले नाही. मात्र पोलिसांनी प्रत्येक गुन्ह्यांचा तपास योग्य पध्दतीने आणि इमानदारीने लावला तर खऱ्या खुऱ्या आरोपींना शिक्षा मिळाली असती. मात्र आज तपास यंत्रणा या संशयास्पद भूमिका बजावतात हा बिकट प्रश्न आहे.