Thursday, April 25, 2024
Homeसंपादकीयविशेष लेखबाळासाहेब आणि संघर्ष

बाळासाहेब आणि संघर्ष

Balasaheb Thackeray and the struggle
Image Courtesy: Qrius

तमाम मराठी जनतेच्या मनात ह्दयात स्थान प्राप्त करणारे ‘हिंदुहृदयसम्राट’ शिवसेनाप्रमुख बाळ केशव ऊर्फ बाळासाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्रात सत्ता असताना आणि सत्तेबाहेर असतानाही राज्याच्या राजकारणावर आपला रिमोट कंट्रोल कायम ठेवला. आज जरी बाळासाहेब नसले तरी त्यांच्या आठवणी, त्यांनी मराठी माणसांना दिलेली एक शक्ती आजही जिवंत आहे. बाळासाहेब एक नाव नसून एक संघर्ष आहे. त्या संघर्षाने सर्वांच्या मनात कायम घर निर्माण करुन जगाचा निरोप घेतला. आज बाळासाहेबांचा सातवा स्मृतीदिवस.

Balasaheb Thackeray and the struggle

सत्ताधीशांच्या प्रत्येक कृतीवर आणि उक्तीवर व्यंगोक्तीपूर्ण टिप्पणी करून सत्ताधीशांचीही भंबेरी उडविण्याची शक्ती ‘व्यंगचित्रकार बाळ ठाकरे’ यांच्या कुंचल्यात होती, तीच शक्ती ‘शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे’ यांच्या लेखणीत आणि प्रखर वक्तृत्वातही होती. मराठी माणसाच्या मनात आपल्या मराठीपणाचा अभिमान रुजविण्याचा वसा त्यांनी शिवसेनेच्या स्थापनेपासून गेली तब्बल ४६ वर्षे अविरतपणे चालविला आणि पार पाडला. मराठी माणसांच्या न्याय्य हक्कांच्या बाजूने लिहायचं ही ‘मार्मिक’ची भूमिका. त्यातले विचार वाचून अस्वस्थ झालेल्या मराठी माणसाचे लोंढेच्या लोंढे ‘मार्मिक’च्या कार्यालयावर थडकू लागले. बाळासाहेबांचे दौरे, भाषणं सुरू झाली. ते पाहून एकदिवशी प्रबोधनकारांनी बाळासाहेबांना संघटना काढण्यास सांगितलं आणि नावही देऊन टाकलं ‘शिवसेना’.

shivsena Balasaheb Thackeray and the struggle

 

‘मार्मिक’च्या पाच जून १९६६ च्या अंकात शिवसेनेच्या स्थापनेबाबतची चौकट छापून आली. १९ जून १९६६ रोजी शिवसेनेची स्थापना झाली. दसऱ्याच्या मुहूर्तावर ३० ऑक्टोबर १९६६ रोजी शिवसेनेचा पहिला मेळावा होणार असल्याचं ‘मार्मिक’मध्ये जाहीर झालं. ‘शिवाजी पार्क’वर सभा घ्यायची असं बाळासाहेबांनी ठरवलं. पण काही बुजुर्ग मंडळींनी पुरेशी उपस्थिती नसली तर पहिल्याच सभेचा बार फुसका ठरेल अशी शंका व्यक्त करत बंदिस्त सभागृहात पहिली बैठक घ्यायची सूचना केली. पण बाळासाहेब ठाम राहिले. सभेच्या दिवशी दुपारपासूनच ढोल-ताशे, लेझिमच्या तालावर पावलं टाकत मराठी माणूस शिवाजी पार्कवर गर्दी करू लागला. सायंकाळपर्यंत मैदान गर्दीने फुलून गेले. शाहीर साबळे यांच्या ‘महाराष्ट्र गीता’ने मेळाव्याची सुरुवात झाली. प्रबोधनकारांनी ‘ठाकरे कुटुंबाचा बाळ या महाराष्ट्राला आज अर्पण करत आहे’ असे जाहीर केलं आणि महाराष्ट्राच्या राजकीय क्षितिजावर ‘शिवसेना’ आणि ‘बाळासाहेब ठाकरे’ या दोन नव्या शक्तींचा उदय झाला.

shivsena Balasaheb Thackeray and the struggle

मुंबई महानगरपालिकेच्या १९६८ च्या निवडणुकीत शिवसेनेने मधु दंडवते यांच्या प्रजा समाजवादी पक्षाशी युती केली आणि शिवसेनेने ४० जागा जिंकल्या. डॉ. हेमचंद्र गुप्ते यांना शिवसेनेचा पहिला महापौर होण्याचा मान मिळाला. फेब्रुवारी १९६८ च्या ‘मार्मिक’मध्ये बाळासाहेबांनी महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नावर जळजळीत अग्रलेख लिहिला आणि त्याचवर्षी नोव्हेंबरमध्ये ते बेळगावला गेले. परत आल्यावर त्यांनी इशारा दिला, ‘निश्चित कालमर्यादेत केंद्राने सीमाप्रश्न सोडवला नाही तर केंद्रीय मंत्र्यांना, काँग्रेस पुढाऱ्यांना मुंबईत प्रवेश नाही’. त्यातून आधी यशवंतराव चव्हाणांची आणि नंतर १९६९ मध्ये केंद्रीय अर्थमंत्री मुरारजी देसाई यांची गाडी अडवण्याचा प्रयत्न झाला. मुरारजींना आंदोलकांवरून गाडी पुढे दामटण्यास चालकाला सांगितलं. त्यातून आंदोलन सुरू झालं व मुंबई पेटली. पोलिसांच्या गोळीबारात तब्बल ५२ माणसं मृत्युमुखी पडली. आंदोलन दडपण्यासाठी बाळासाहेबांना अटक झाली. ही त्यांच्या आयुष्यातील पहिली अटक. यातूनच शिवसेना स्टाईल ‘मुंबई बंद’ सुरू झाला.

Balasaheb Thackeray and the struggle

१९६७ च्या डिसेंबरमध्ये परळच्या दळवी बिल्डिंगवरील हल्ल्याच्या घटनेपासून शिवसेना-साम्यवादी संघर्ष चिघळला होता. १९७० च्या जूनमध्ये साम्यवादी आमदार कृष्णा देसाईंचा खून झाला. कृष्णा देसाईंच्या निधनामुळे परळला पोटनिवडणूक झाली आणि सेनेचे वामनराव महाडिक विधानसभेवर निवडून गेले. १९७३ च्या मंबई महानगरपालिका निवडणुकीत शिवसेनेने ‘मुस्लिम लीग’शी, रिपब्लिकन पक्षाशी युती केली. सप्टेंबर १९७३ मध्ये महाराष्ट्र सरकारच्या उद्योग संचालनालयाने स्थानिक भूमिपुत्रांना सर्व श्रेणींत नोकऱ्या दिल्या पाहिजेत असा आदेश काढला. हा सेनेचा विजय होता. ठाण्याच्या एका प्रचारसभेत श्रोत्यांमधून बाळासाहेबांना एक चिठ्ठी आली. ‘शिवसेनेच्या हाती सत्ता दिल्यास ठाणेकरांसाठी एक नाटय़गृह मिळेल काय?. बाळासाहेबांनी भाषणात जाहीर केलं, ‘तुम्ही आम्हाला सत्ता द्या, मी तुम्हाला नाटय़गृह देतो’. गडकरी रंगायतन आणि दादोजी कोंडदेव स्टेडियम ही बाळासाहेबांच्या वचनपूर्तीची दोन उदाहरणे आहेत.

Balasaheb Thackeray and the struggle

१९७५ मध्ये पंतप्रधान इंदिरा गांधींनी देशात आणीबाणी जाहीर केली, तेव्हा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी त्यास पाठींबा दिला. १९७७ मध्ये शिवसेना भवन ही वास्तू उभी राहिली. १९७८ मध्ये शिवसेनेने विधानसभा निवडणूक लढवली. निशाणी नसल्याने सेना उमेदवारांना वेगवेगळय़ा चिन्हांवर निवडणूक लढवावी लागली. बाळासाहेब १९७९ मध्ये आजारी पडले. ‘विषमज्वर’मुळे सहा महिने ते अंथरुणाला खिळून पडले होते. शिवसेनेचं पहिलंवहिलं अधिवेशन १९८१ मध्ये शिवाजी पार्कजवळच्या स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकात झालं. प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते थोर साम्यवादी नेते श्रीपाद अमृत डांगे.

Balasaheb Thackeray and the struggle

 

मुंबईतल्या गिरणी कामगारांच्या प्रश्नावर १९८२ मध्ये जॉर्ज फर्नाडिस, शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरे एकत्र आले. तिघांची संयुक्त सभा शिवाजी पार्कवर झाली. १९८४ मध्ये शिवसेना-भाजपा युती झाली तेव्हा बाळासाहेबांनी भाजप नेते वेदप्रकाश गोयल यांच्या शीव इथल्या घरी भाजपाचे अध्यक्ष अटलबिहारी वाजपेयी यांची भेट घेतली. इंदिरा गांधीच्या हत्येच्या पाश्र्वभूमीवर झालेल्या निवडणुकीत युतीचा पराभव झाला. युती तुटलीही. १९७५ ते १९८५ हा कालखंड शिवसेनेला बिकट गेला. अशात मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका लागल्या. मुख्यमंत्री वसंतदादा पाटील म्हणाले, ‘महाराष्ट्रात मुंबई आहे, पण मुंबईत महाराष्ट्र नाही.’ वातावरण तापलं आणि शिवसेनेला महानगरपालिका निवडणुकीत घवघवीत यश मिळालं.

पाल्र्याच्या निवडणुकीत बाळासाहेबांनी हिंदुत्वाचा नारा दिला आणि पुढे त्यातूनच भाजपाने शिवसेनेशी युती केली. १९८९ च्या लोकसभा निवडणुकीत युतीचे १४ खासदार निवडून आले. १९९० च्या विधानसभा निवडणुकीत युतीचे ९४ आमदार निवडून आले. वृत्तपत्रांमधून होणाऱ्या टीकेला उत्तर देण्यासाठी २३ जानेवारी १९८९ रोजी ‘सामना’ सुरू झाला. तर हिंदुत्वाच्या मुद्दय़ामुळे अमराठी वर्गही सेनेकडे आकर्षित झाला. त्यातूनच ‘दोपहर का सामना’ची सुरुवात झाली. विरोधी पक्षनेतेपदी डावलले गेल्याने डिसेंबर १९९१ मध्ये छगन भुजबळ यांनी शिवसेना सोडली. शिवसेनेतलं पहिलं बंड झालं. सहा डिसेंबर १९९२ रोजी बाबरी मशीद पडली. मुंबईत दंगली सुरू झाल्या. सहा जानेवारी १९९३ ला पुन्हा दंगली सुरू झाल्या. शिवसैनिक रस्त्यावर उतरले. १९९५ च्या विधानसभा निवडणुका लागल्या. बाळासाहेबांनी महाराष्ट्रभर झंझावाती दौरा केला. १९९० मध्ये हुकलेली संधी शिवसेना-भाजपा युतीने साधली. महाराष्ट्रात युतीची सत्ता आली. शिवाजी पार्कवर मुख्यमंत्र्यांचा शपथविधी झाला.

आज बाळासाहेब हयात नसले तरी त्यांच्या शिवसेना पक्षाला 2019 मध्ये शिवसेनेचा मुख्यमंत्री करण्याची संधी चालून आली आहे. ती संधी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस या दोन पक्षांच्या पाठिंब्यामुळे शिवसेना सत्तास्थापन करणार आहे. शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांनी शिवसेना प्रमुखांना शिवसेनेचा मुख्यमंत्री करणार हा शब्द दिला होता. जो वचन दिला होता त्याची पूर्तता होणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments