नवी दिल्ली: जगातील सात आश्चर्यांपैकी एक असलेला ताजमहाल हा पुन्हा एकदा वादात सापडला आहे. ताजमहाल हे हिंदूंचे मंदिर होते त्या ठिकाणी कबर बांधण्यात आली अशी टीका केली आहे. टाइम्स नाऊ या इंग्रजी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हा आरोप केला आहे.
ताज महोत्सव असो की तेज महोत्सव या दोहोंमध्ये काहीही फरक नाही. ताज महोत्सव होतो आहे ही चांगली बाब आहे. मात्र ताजमहाल हिंदूंचे मंदिर होते जिथे नंतर कबर बांधली गेली असा आरोप विनय कटियार यांनी केला आहे. ज्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. एक वेळ अशी येईल की कोणता तरी सत्ताधारी आत असलेली कबर हटवेल आणि त्यानंतर त्या जागी फक्त मंदिर राहिल असेही कटियार यांनी म्हटले आहे. तेजमहाल हा आमचा वारसा आहे. तो सुरक्षित ठेवण्याची जबाबदारीही आमचीच आहे असेही कटियार यांनी म्हटले आहे.
ताजमहालाबद्दल भाजपमध्येच दोन मतप्रवाह दिसून येत आहेत. काही दिवसांपूर्वी भाजपचे आमदार संगीत सोम यांनी ताजमहाल हा भारतीय संस्कृतीवर लागलेला सर्वात मोठा कलंक आहे असे म्हटले होते. तसेच ताजमहालची निर्मिती करणाऱ्या मुगल शासकांनी हिंदूंचा सर्वनाथ केला अशीही टीका त्यांनी केली होती. तर उत्तरप्रदेशात योगी आदित्यनाथ मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी ताजमहाल हे ठिकाण पर्यटन स्थळांच्या यादीतून बाहेर काढले होते.
योगी सरकारने तयार केलेल्या पर्यटन स्थळांच्या यादीत गंगा आरती आणि गोरखधाम मंदिर यांचा समावेश होता. यावरून वाद निर्माण झाल्यावर ताजमहाल भारताचा ऐतिहासिक वारसा आहे असे वक्तव्य योगी आदित्यनाथ यांनी केले होते. आता भाजपचेच आक्रमक नेते विनय कटियार यांनी ताजमहाल हे हिंदूंचे मंदिर होते तिथे नंतर कबर बांधण्यात आली असे म्हटले आहे.