बंगळुरु: कर्नाटक निवडणुकीत काँग्रेसची सत्ता येते की भाजपची सत्ता येते याकडे संपुर्ण देशाच लक्ष लागल आहे. कर्नाटकमध्ये त्रिशंकु स्थिती तयार झाल्यानंतर सत्ता संघर्ष पाहायला मिळतो आहे. काँग्रेससोबत हात मिळवणाऱ्या जेडीएसच्या मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार कुमारस्वामी यांनी म्हटलं की, ‘मी स्पष्टपणे सांगू इच्छितो की, मला काँग्रेस आणि भाजप दोन्ही पक्षांकडून ऑफर मिळाली होती पण २००४ आणि २००५ मध्ये भाजपसोबत युती केल्यामुळे माझे वडील एचडी देवेगौडा यांचं राजकीय कारकीर्दीवर डाग लागला होता. आता देवाने तो डाग हटवण्यासाठी संधी दिली आहे. यामुळे मी काँग्रेससोबत हात मिळवणी केली.’
देवेगौडा यांनी याआधीच म्हटलं होतं की, कुमारस्वामीमुळे त्यांच्या ‘सेक्युलर’ प्रतिमेला धक्का बसला होता. कारण मुलाने भाजपसोबत युती करुन २००४ आणि २००५ मध्ये सत्ता मिळवली. त्याचं नुकसान पक्षाला झालं. १० वर्ष पक्ष सत्तेतून बाहेर राहिला. याआधी देवेगौडा यांनी निकालाआधी म्हटलं होतं की, जर कुमारस्वामी भाजपसोबत युती करेल तर ते त्यांच्यासोबतचे सर्व संबंध तोडून टाकतील.’ यामुळेच कुमारस्वामी यांनी काँग्रेससोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे.