गुवाहाटी: नागरिकत्व कायद्याला मोठ्या प्रमाणात देशभरात विरोध होत आहेत. आसामची राजधानी गुवाहाटीमध्ये नागरिकत्व कायद्याला विरोध कायम असून, यामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. गुवाहाटीमध्ये अन्नधान्य मिळण्यात मोठी अडचण येत असून, टंचाईमुळे दर गगनाला भिडले आहेत. बँकांच्या एटीएममधील रोख रक्कम संपली असून सर्वत्र खळखळाट दिसत आहेत. तर पेट्रोलपंप कोरडे ठाक पडले आहेत. यामुळे नागरिकांची चांगलीच अडचण होत आहे.
इंधन पोहोचू शकत नसल्यामुळे पेट्रोल पंप ओस पडताना दिसत आहेत. एवढेच नव्हे तर चिकनचा दर प्रतिकिलोसाठी ५०० रुपयांवर पोहोचला आहे. गुवाहाटीमध्ये लागू करण्यात आलेली संचारबंदी शनिवारी शिथिल केल्यानंतर नागरिक गरजेच्या वस्तू, अन्नधान्य खरेदी करण्यासाठी बाहेर पडले. यावेळी बाजारात कांद्याचे दर २५० रुपये, बटाटे ६० रुपये प्रतिकिलोवर पोहोचले आहेत. चिकनचे दर प्रतिकिलोसाठी ५०० रुपये, तर मासे ४२० रुपयांनी विक्रीसाठी उपलब्ध आहेत.