नवी दिल्ली: अर्थतज्ज्ञ अभिजीत बॅनर्जी यांना अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार जाहीर झाला. त्यावर केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी टिपणी केली होती. त्यानंतर गोयल यांच्यावर राहुल गांधी यांनी निशाणा साधला. हे कट्टरपंथी द्वेषात आंधळे झाले आहेत. जाणकार आणि तज्ज्ञ व्यक्ती काय असतात, याचा अंदाजही त्यांना नाही, नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.
अर्थशास्त्राचे नोबेल पुरस्कार विजेते अभिजीत बॅनर्जी हे डाव्या विचारसरणीचे असल्याची टीका गोयल यांनी पुण्यातील पत्रकार परिषदेत केली होती. त्यावर बॅनर्जी यांनीही प्रत्युत्तर दिलं होतं. केंद्रीय मंत्र्यांनी माझ्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत, असं ते म्हणाले होते. राहुल गांधी यांनी ट्विट करून गोयल यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. ‘बॅनर्जी, हे कट्टरपंथी द्वेषात आंधळे झाले आहेत. एखाद्या तज्ज्ञ, जाणकार व्यक्ती काय असते, हे त्यांना ठाऊक नाही. तुम्ही एक दशक यांना समजावण्याचा प्रयत्न केला तरी ते ही बाब समजू शकत नाहीत. तुम्ही करत असलेल्या कामामुळं लाखो भारतीयांना तुमच्याबद्दल अभिमान वाटतो,’असं राहुल यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.
Dear Mr Banerjee,
These bigots are blinded by hatred and have no idea what a professional is. You cannot explain it to them, even if you tried for a decade.
Please be certain that millions of Indians are proud of your work. https://t.co/dwJS8QtXvG
— Rahul Gandhi (@RahulGandhi) October 20, 2019