अहमदाबाद: गुजरात आणि हिमाचल विधानसभा निवडणुकांमधील भाजपचा विजय ही राहुल गांधी यांना काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यानंतरची भेट आहे, अशी उपरोधिक टीका भाजप खासदार आणि अभिनेते परेश रावल यांनी केली.
गुजरात आणि हिमाचल निवडणुकांच्या निकालापूर्वीच राहुल गांधी यांच्याकडे काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्षपद सोपवण्यात आले. या दोन्ही राज्यांच्या निवडणुका त्यांच्या नेतृत्वाखाली लढवल्या गेल्या. त्यामुळे राहुल गांधींची जादू चालणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. मात्र, काँग्रेस पक्षाची कुठेतरी निराशा झाल्याने आता राहुल गांधींच्या नेतृत्व क्षमतेविषयी पुन्हा शंका निर्माण होण्याची शक्यता आहे.
परेश रावल यांनी ट्विटरच्या माध्यमातून राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे. भाजपने मिळवलेले यश ही राहुल यांच्यासाठी भेटच आहे, असे त्यांनी ट्विट केले. त्यासोबतच त्यांनी पत्रकार बरखा दत्त यांचाही उल्लेख केला आहे. त्यांचा आज वाढदिवस असल्याने हा विजय त्यांच्यासाठीही खास भेट आहे, असे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले.
BJP win in guj n Himachal is a gift to Raga on him becoming a president of Cong n to @BDUTT on her birthday. !
— Paresh Rawal (@SirPareshRawal) December 18, 2017
पंतप्रधान नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधी अशी थेट लढत या निवडणुकांमध्ये पाहायला मिळाला. २०१९ च्या निवडणुकांमध्येही काँग्रेसच्या पंतप्रधान पदाचा चेहरा राहुल गांधीच असतील. तरीही काँग्रेसने गेल्या निवडणुकांपेक्षा या निवडणुकांमध्ये चांगली कामगिरी केली असे म्हणायला हरकत नाही.