नवी दिल्ली : काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी भाजपवर सडकून टीका केली आहे. सोनिया गांधी म्हणाल्या, CAA आणि NRC वरून मोदी आणि शहांनी देशाची दिशाभूल केली. त्यांनी खोटी माहिती देत लोकांमध्ये भांडणं लावण्याचं काम केलं. JNU मध्ये भाजपच्या लोकांनी जो हल्ला केला तो सर्व देशाने पाहिलाय. मात्र हल्लेखोरांवर अजुन कारवाई केली गेली नाही. मोदी सरकार देश चालविण्याच्या लायक नाही असा गंभीर आरोप केला आहे.
आज सोमवारी (१३ जानेवारी ) विरोधी पक्षांची बैठक बोलावली होती. आज झालेल्या बैठकीत अनेक मुद्द्यावर चर्चा करण्यात आली. यात नागरिकत्व संशोधन विधेयक (सीएए) या विरोधात झालेले आंदोलन आणि अनेक विद्यापीठ परिसरात झालेल्या हिंसाचारानंतर उद्भवलेली परिस्थिती, देशातील आर्थिक मंदी यासारख्या मुद्द्यावर चर्चा करण्यात आली. या बैठकीत सोनिया गांधी यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले. पंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्री हे देशातील लोकांची दिशाभूल करीत आहेत. या दोन्ही नेत्यांनी काही आठवड्यापूर्वी केलेल्या स्वतःच्या विधानाचे त्यांनीच खंडण केले आहे, असे सोनिया गांधी यावेळी म्हणाल्या. मोदी-शहा यांच्याकडून आक्षेपार्ह विधाने करण्यात आली असून त्यांनी असे करणे कायम ठेवल्याचेही सोनिया गांधी म्हणाल्या. केंद्र सरकार संविधानाला कमकुवत करण्याचा प्रयत्न करीत आहे. तसेच केंद्र सरकारकडून सत्तेचा दुरूपयोग केला जात आहे. याविरोधात देशभरात आंदोलन करण्यात येत आहे. सीएए आणि एनआरसी हे तत्कालिक कारण आहे. परंतु, यामुळे व्यापक नैराश्य आले आहे. लोकांमध्ये प्रचंड राग आहे. उत्तर प्रदेश आणि दिल्ली पोलिसांची वागणूक ही पक्षपाती आणि क्रूर होती, असेही सोनिया गांधी म्हणाल्या.
Congress Interim Pres Sonia Gandhi at opposition meeting: Govt has let loose reign of oppression, spreading hatred&trying to divide our people along sectarian lines. There’s unprecedented turmoil. Constitution is being undermined&instruments of governance being misused.(file pic) pic.twitter.com/Zw4ZKbBwOu
— ANI (@ANI) January 13, 2020
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी बोलावलेल्या या बैठकीला २० पक्षांचे नेते उपस्थित होते. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, काँग्रेसचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी, राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल, ए. के. अँटनी, के. सी. वेणुगोपाल, गुलाम नबी आझाद, रणदीप सुरजेवाला, सीताराम येचुरी, डी. राजा, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन, राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल, राजदचे मनोज झा, अजित सिंह यांची प्रमुख उपस्थिती होती.
बैठकीत या विषयावर झाली चर्चा….
या बैठकीत सीएए विरोधी आंदोलन, जेएनयू, जामिया मिल्लिया इस्लामिया आणि अन्य काही विद्यापीठात झालेल्या हिंसाचारानंतर उद्भवलेली परिस्थिती, देशातील आर्थिक मंदी, बेरोजगारी, कृषि संकटावर चर्चा करण्यात आली.