नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मनमोहन सिंग यांच्याविरुद्ध केलेल्या वक्तव्याचा लोकसभेच्या आजच्या (बुधवार) कामकाजावरही परिणाम झाला. पंतप्रधान मोदींनी आपल्या वक्तव्यावर माफी मागावी, या मागणीसाठी काँग्रेसच्या सदस्यांनी गोंधळ घातल्याने कामकाज दुपारपर्यंत तहकूब करण्यात आले.
आजच्या दिवसाचे कामकाज सुरू होताच काँग्रेसच्या सदस्यांनी अध्यक्षांच्या आसनासमोर जाऊन मोदींनी माफी मागावी अशी मागणी केली. विरोधकांच्या घोषणाबाजीने व गदारोळामुळे अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी सभागृहाचे कामकाज दुपारी १२ पर्यंत तहकूब केले. -दरम्यान राज्यसभेचे कामकाज सुरू होताच काँग्रेस खासदारांनी मोदींनी मनमोहन सिंगांची माफी मागावी, अशी मागणी करत सभागृह डोक्यावर घेतले. त्यामुळे सभापती व्यंकय्या नायडू यांनी सभागृहाचे कामकाज दुपारी २ वाजेपर्यंत तहकूब केले. गुजरात निवडणुकीच्या प्रचारादरम्यान पंतप्रधान मोदींनी आरोप केला होता की, काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांच्या निवासस्थान पाकिस्तानच्या नेत्यांबरोबर गोपनीय बैठक झाली होती. त्यामध्ये माजी पंतप्रधान मनमोहन सिंग व पाकिस्तानचे उच्चायुक्त साहील मोहम्मद व पाकचे माजी परराष्ट्र मंत्री खुर्शीद कसुरी सामील होते. बैठकीमध्ये गुजरातच्या निवडणुकीवर चर्चा झाली होती.