नागपूर : विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधी पक्षाच्या आमदारांनी सरकारविरोधात घोषणाबाजी करत पायर्यांवर आंदोलन केलं आहे. उद्या १२ डिसेंबर रोजी सर्व विरोधी पक्षांचे सरकारच्या विरोधात हल्लाबोल आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे.यामुळे संपूर्ण हिवाळी अधिवेशन गोंधळताच होण्याची शक्यता आहे.
शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळाली पाहीजे या मागणीवर हल्लाबोलच्या घोषणा दिल्या. कर्जमाफी व्यतिरिक्त बीटी बियाणं आणि कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नावरूनही विरोधक सरकारला घेरण्याच्या तयारीत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसने सरकार विरोधात हल्लाबोल आंदोलनही अधिवेशनाआधी काढले होते. काल अधिवेशनाच्या आधल्या दिवशी होणाऱ्या चहापानाच्या कार्यक्रमावर विरोधकांनी बहिष्कार घातला होता.
गुजरातमध्ये जसा विकास वेडा झालाय तशी महाराष्ट्रात पारदर्शकता वेडी झाल्याची टीका विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली होती. अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेत्यांची बैठक झाली होती. या बैठकीनंतरच्या पत्रकार परिषदेत विरोधकांनी सरकारवर हल्लाबोल केला होता. त्यामुळे एकंदर या अधिवेशनात सरकारला घेरण्याच्या पवित्र्यात विरोधक आहेत हे आता स्पष्ट दिसतं आहे.