मुंबई : शिवसेना भाजप सत्तासंघर्षावरून गोंधळ कायम आहे. तेरा दिवस उलटले तरी युतीमध्ये मुख्यमंत्रीपदावरून दिलजमाई झाली नाही. महाराष्ट्रातील तेराव्या विधानसभेची मुदत ९ नोव्हेंबरला संपणार आहे. तोपर्यंत नवे सरकार अस्तित्वात येऊन हंगामी अधिवेशन होण्याची गरज आहे. अन्यथा राष्ट्रपती राजवटीला सामोरे जाण्याची शक्यता आहे.
मतदारांनी युतीला कौल दिला. मात्र, युतीच्या सत्तावाटपाच्या वादातून गोंधळ निर्माण झालेला आहे. मात्र, अतिवृष्टीमुळे बळीराजा उद्ध्वस्त झालेला असताना युतीत १३ दिवसांपासून सत्तेसाठी भांडणे सुरू आहेत. विरोधी बाकावरील काँग्रेस-राष्ट्रवादीही सत्तासंघर्षाचा तमाशा बघण्यात मग्न आहेत. सत्तेच्या या साठमारीत पिचलेल्या बिचाऱ्या शेतकऱ्याला व सर्वसामान्य नागरिकांवर ‘कुणी सरकार देता का सरकार?’ म्हणण्याची वेळ आलीय.
महाराष्ट्रातील तेराव्या विधानसभेची मुदत ९ नाेव्हेंबरपर्यंत आहे. ताेपर्यंत नवे सरकार अस्तित्वात येऊन हंगामी अधिवेशन हाेण्याची गरज आहे. मात्र, भाजप- शिवसेनेतील सत्तासंघर्षामुळे या मुदतीत नवी विधानसभा अस्तित्वात येण्याची शक्यता कमीच दिसत आहे.
ठरलेल्या मुदतीत नवी विधानसभा अस्तित्वात न आल्यास राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होऊ शकते. मात्र, युतीकडे स्पष्ट बहुमत असल्यामुळे त्यांच्यात एकमत होण्यासाठी राज्यपाल स्वत:च्या अधिकारात या दोन्ही पक्षांना समन्वयासाठी वाढीव मुदत देऊ शकतात. मात्र पुढे काय होणार हे दोन्ही काँग्रेसच्या भूमिकेवरून स्पष्ट होईल. त्यामुळे युतीपेक्षा जास्त काँग्रेस महाआघाडीच्या भूमिकेकडे सर्व राज्याचे लक्ष लागून आहे.