मुंबई: निवडणूक आयोग आज 20 सप्टेंबर दुपारी 2 वाजता पत्रकार परिषद घेत आहे. या पत्रकार परिषदेत महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे.
देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी याआधीच महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा आढावा घेतला होता. त्या बैठकीनंतर त्यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुका दिवाळीच्या अगोदरच घेण्याबाबत सकारात्मक असल्याचं म्हटलं होतं. त्यामुळे आता फक्त औपचारिक घोषणा बाकी असल्याचंही बोललं जात आहे.
विधानसभा निवडणुकांचा हंगाम सुरु झाला असून राजकीय नेत्यांसह सर्वसामान्य मतदारांना निवडणुकांचे वेध लागले आहेत. निवडणूक आयोगाच्या आजच्या पत्रकार परिषदेत महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता आहे.
संपूर्ण राज्यात एकाच टप्प्यात मतदान होईल, असाही अंदाज वर्तवला जात आहे. आगामी काळात महाराष्ट्रासह एकूण 3 राज्यांच्या निवडणुका होणार आहेत. यामध्ये महाराष्ट्र, हरियाणा आणि झारखंडचा समावेश आहे. महाराष्ट्र आणि हरियाणाच्या निवडणूक तारखा एकाचवेळी जाहीर होतील. तर झारखंडच्या निवडणुकांच्या तारखा नोव्हेंबरच्या शेवटी किंवा डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात जाहीर होतील, असा अंदाज आहे.
राज्यात 22 ऑक्टोबरपर्यंत नवी विधानसभा अस्तित्वात येणं गरजेचं असल्याचं आहे. निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी किमान 31 दिवस आवश्यक असल्याने सप्टेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात निवडणुकांची घोषणा होईल. त्यासोबतच राज्यभरात आचारसंहिता लागू होईल. दिवाळी 25 ऑक्टोबरला असल्यामुळे त्यापूर्वीच मतदान आणि मतमोजणी प्रक्रिया पूर्ण करण्याकडे निवडणूक आयोगाचा कल असेल. मंत्रिमंडळ अस्तित्वात येण्यासाठी मात्र दिवाळीनंतरचा मुहूर्त लागेल.