औरंगाबाद: उद्योजकांना चालना मिळावी यासाठी विविध योजना आहेत. मात्र राष्ट्रीयकृत बँका या उद्योजकांना योग्य प्रतिसाद देत नाहीत. त्यांना वाटते की हे लोक पैसे बुडवतील. मात्र या बँकांनी लघु उद्योजकांना प्रोत्साहन दिले पाहिजे, ते काही नीरव मोदी किंवा विजय मल्ल्या नाहीत जे पळून जातील. असा खोचक सल्ला राज्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी दिला आहे.
औरंगाबादमध्ये नॅशनल एससी-एसटी हबचं आयोजन करण्यात आले होते त्यावेळी सुभाष देसाई बोलत होते. किर्लोस्कर यांनी छोट्या उद्योगापासून सुरुवात केली. आज जगात त्यांचा ब्रँड आहे. त्यामुळे आपण लहान आहोत. याची खंत बाळगायची नाही.अनुसूचित जाती जमातीच्या उद्योजकांसाठी सुरु केलेल्या हबच्या माध्यमातून केंद्र सरकारने अनेक योजना सुरू केल्या आहेत. त्याचा लाभ घ्यायला हवा. केवळ हातात डिग्री घेतली म्हणून प्रश्न सुटत नाही. कौशल्य असणे गरजेचे आहे. त्यासाठी प्रशिक्षणही देण्यात येते. कोणालाही अडचणी येणार नाहीत. इच्छाशक्ती असलेले तरुण उद्योग करू शकतात. नवीन उद्योग करणाऱ्यांना आता हेवढं चांगला काळ कधी नव्हता असे देसाई म्हणाले.
राज्यसरकारने महिला उद्योग धोरण आखल असून त्यानुसार महिलांचा उद्योगातील वाटा ९ टक्के आहे. तो २० टक्के नेण्याचा मानस आहे.त्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. राज्यात क्लस्टर विकासाला चालना देण्याचे काम राज्य सरकार कार्य करत आहे. यामध्ये औरंगाबादमध्ये पैठणी, उस्मानाबादमध्ये खवा आणि नांदेडमध्ये प्रिंटींगचे क्लस्टर उभारले आहे. उद्योगक्षेत्राला पुढे घेऊन जाण्यासाठी महाराष्ट्राने जीएसटीवर देशात पहिल्यांदा धोरण केले आहे. महिलांनीही उद्योग क्षेत्रात पुढे यावे याकरिता स्वतंत्र महिला धोरण तयार केले आहे, ही भूषणावह अशीच बाब असल्याचे देसाई यांनी आवर्जून सांगितले.
मुंबईतील बीकेसी मैदानावर १८ तारखेला मॅग्नेटिक महाराष्ट्र हा कार्यक्रम होणार आहे. या माध्यमातून राज्यात १० लाख कोटीच्या गुंतवणुकीचे लक्ष असल्याचे देसाई यांनी सांगितले. मेक इन महाराष्ट्र मधून 8 लाख कोटीची गुंतवणूक करण्यात आली होती. त्यातून २०१६ ते २०१८ या कलावधीत २१२१ उद्योग सुरू होत आहेत.