मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांना आता वाय दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे. ही भारतातील तिसऱ्या क्रमांकाची सुरक्षा व्यवस्था आहे. वाय दर्जाच्या सिक्युरिटी मध्ये एकूण 11 कर्मचारी असतात ज्यात 1 किंवा 2 कमांडो आणि बाकी पोलीस ऑफिसर्स कर्तव्य बजावत असतात. यामध्ये 2 PSO सुद्धा असतात. भारतामध्ये बऱ्याच महत्वाच्या व्यक्तींना ही सुरक्षा प्रदान केली गेली आहे.
महाराष्ट्र विकास आघाडी योग जुळवण्यात शिवसेना खासदार संजय राऊत यांचा सिंहाचा वाटा आहे. विधानसभा निकालापासून ते भाजपवर सडकून टीका करत आहेत. भाजपच्या नेत्यांकडून राऊतांनाही प्रतिउत्तर देण्यात आलं आहे. आज शपथविधी सोहळा होत असून, आजपासून संजय राऊतांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.
भारतात काही विशिष्ट व्यक्तींना पोलीस किंवा स्थानिक प्रशासनातर्फे सुरक्षा प्रदान केली जाते. या महत्त्वाच्या किंवा अति महत्वाच्या व्यक्तींच्या जीवाला धोका होऊ नये म्हणून ही व्यवस्था करण्यात आली आहे. संभाव्य धोक्याची पातळी किती आहे यावरून कोणत्या दर्जाची सुरक्षा द्यायची हे ठरवले जाते. आपल्या भारतामध्ये व्यक्तींना दिल्या जाणाऱ्या सुरक्षेला चार भागात विभागले गेले आहे. तुम्ही बातम्यांमध्ये किंवा वर्तमानपत्रात हे शब्द नक्कीच ऐकले, वाचले असतील. उच्चतेनुसार उतरत्या क्रमवारीने पुढील प्रमाणे ‘सिक्युरिटी लेव्हल्स’ आहेत. (Z+),(Z), (Y) आणि (X).
मंडळी, सर्वसामान्य जीवन जगणाऱ्या आपल्यासारख्या लोकांच्या जीवाला धोका तसा कमीच असतो. असला तरी आपल्याला सरकारी सुरक्षा मिळणे दुर्लभच आहे. परंतु राष्ट्रपती, पंतप्रधान, उपपंतप्रधान, मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री, खासदार, आमदार, न्यायाधीश, बिझनेसमन, क्रिकेटर्स, फिल्म स्टार्स, समाज मान्यता पावलेले साधू संत यांच्या सारख्या व्यक्तींना सुरक्षा ही लागतेच! काही वेळा एखाद्या घटनेत महत्वाचे स्थान बजावणाऱ्या सामान्य व्यक्तीना सुद्धा सुरक्षा प्रदान करता येते.