मनसे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना अखेर जामीन मंजूर झाला आहे. नर्सेस आंदोलन प्रकरणी ठाण्याच्या कापुरबावडी पोलिसांनी जाधव यांना अटक केली होती.
वसई पालिका आयुक्त दालन आंदोलन प्रकरणी मनसे नेते अविनाश जाधव यांना आधी तडीपारीची नोटीस बजावण्यात आली होती. त्यानंतर ठाण्याच्या खंडणीविरोधी विभागाने जाधव यांना 31 जुलै रोजी अटक केली होती. ठाणे दिवाणी न्यायालयात त्यांचा जामीन अर्ज सोमवारी फेटाळण्यात आला होता, मात्र ठाणे सत्र न्यायालयाने सात दिवसानंतर जामीन मंजूर केला आहे.
अविनाश जाधव यांना 15 हजार रुपयांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर केला असल्याचे मनसेचे वकील राजेंद्र शिरोडकर यांनी सांगितले. “न्यायालयावर आमचा विश्वास आहे, अविनाश जाधव यांच्यावर राजकीय गुन्हे असून लोकशाहीच्या मार्गाने त्यांनी कोविडसाठी आंदोलन केले होते. त्यामुळे जनतेसाठी ही लढाई होती. पुढेदेखील अशीच लढाई जनेतेसाठी सुरू राहील” असे मनसे नेते नितीन सरदेसाई यांनी सांगितले.
ठाणे पोलिसांनी कोर्टाकडून अधिक वेळ मागितला होता. तर अविनाश जाधव यांच्या वकिलांनी जामिनासाठी युक्तिवाद केला. दोन्ही बाजूचे युक्तिवाद न्यायाधीश पी पी जाधव यांनी ऐकून घेतले आणि त्यांना जामीन मंजूर केला. अविनाश जाधव यांना सोमवारी पोलीस स्थानकात हजेरी द्यावी लागणार आहे.
ठाणे न्यायालयाने अविनाश जाधव यांना सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी पोलीस कोठडी सुनावली होती. महापालिकेच्या कोव्हिड रुग्णालयात नर्स म्हणून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कामावरुन काढल्या प्रकरणी मनसे महापालिका मुख्यालयासमोर आंदोलन करत असताना गेल्या शुक्रवारी पोलिसांनी अटक केली होती.