ठाणे- बदलापूर येथे महालक्ष्मी एक्स्प्रेसमध्ये पुरपरिस्थितीमुळे अडकलेल्या प्रवाशांची ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय, मध्य रेल्वे, पोलिस प्रशासन, एनडीआरएफ तसेच स्थानिक गावक-यांनी एकजुटीने काम करीत सुखरूप सुटका केली. पण सकाळी ९.३० पासून ठाणे महानगरपालिकेच्या ठाणे आपत्ती प्रतिसाद दलाच्या २० जवानांनी केलेल्या कामगिरीचे आणि महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी या आपत्कालीन परिस्थितीमध्ये घेतलेल्या पुढाकाराचे पालकमंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्यासह सर्वांनीच कौतुक केले.
बदलापूर येथे निर्माण झालेल्या परिस्थितीबाबत सकाळी ६ वाजता राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता यांनी महापालिका आयुक्तांशी संपर्क साधून सूचना केल्या होत्या. त्यानंतर श्री. जयस्वाल यांनी तातडीने ६.३० वाजता महापालिकेच्या ठाणे आपत्ती प्रतिसाद दलाच्या पथकाला तातडीने घटनास्थळी रवाना केले. सदर पथक सकाळी ९.३० वाजता पोहोचून मदतकार्याला सुरूवात केली.
एनडीआरएफचे पथक घटनास्थळी पोहोचेपर्यंत महापालिका आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली मुख्य अग्नीशामन अधिकारी यांच्या सहकार्याने डेप्युटी कंमाडंट अरूण राऊत यांच्या नेतृत्वाखाली २० जवानांच्या साहाय्याने मदतकार्याला सुरूवात केली. एनडीआरएफची टीम घटनास्थळी दाखल झाल्यानंतर त्यांच्यासोबत टीडीआरएफच्या जवानांनी यशस्वीपणे मदतकार्य केले.
टीडीआरएफच्या या कार्याचे पालकमंत्री ना. एकनाथ शिंदे यांनी कोतुक केले. दरम्यान महालक्ष्मी एक्स्प्रेसमधील प्रवाशांच्या सुटकेसाठी जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, मध्य रेल्वेचे विभागीय प्रबंधक, एनडीआरएफ यांनी केलेल्या कामगिरीचे कौतुक केले.