ठाणे – केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत देशातील स्मार्ट सिटीमध्ये ठाणे शहराचा समावेश झालेला आहे. तरीही स्मार्ट सिटी स्वप्न बघणाऱ्या ठाणे महापालिका हद्दीतील घोडबंदर परिसरात रस्त्यांवर खड्डेच खड्डे पडलेले आहेत यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याने युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी या खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करत महापालिका प्रशासनाचा निषेध केला आहे.
ठाणे शहरातील घोडबंदर रोडवरील अनेक ठिकाणच्या वर्दळीच्या सर्व्हिस रस्त्यावर जीवघेणे खड्डे पडले आहेत. महापालिकेच्या सत्ताधाऱ्यांना खड्ड्यांची माहिती व्हावी यासाठी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव आशिष गिरी यांनी आनंद नगर येथील सर्व्हिस रोडवर खड्ड्यांमध्ये वृक्ष लागवड करत स्मार्ट रांगोळ्या काढत ठाणे महापालिका विरोधात निदर्शने करून अनोखे आंदोलन केले. यावेळी उपाध्यक्ष तुषार गायकवाड,ठाणे युवक काँग्रेस सचिव निलेश दास,संदीप तायडे,सान्यो वाघमारे,गोविंदा परदेशी आदी सह कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. मागील काही महिन्यापासून घोडबंदर रोडवरील सर्व्हिस रोडवर व आजूबाजूला मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. काम संपल्यानंतर हे खड्डे बुजवण्यात येत नाहीत. त्यामुळे त्याचा त्रास वाहनचालकांना सहन करावा लागत आहे. यासाठी युवक काँग्रेसच्या वतीने सदरचे आंदोलन करण्यात आले.
३६०० कोटी रुपयांचे बजेट असलेल्या ठाणे महानगरपालिकेत स्मार्ट सिटीच्या नावाने अनेक प्रकल्प सुरू आहेत असे असताना जीवनावश्यक वस्तू ठाणेकर नागरिकांना मिळणे कठीण झाले आहे. पाणी व रस्ते या मूलभूत सुविधांपासून नागरिकांना वंचित आहेत.ठाण्याच्या घोडबंदर रोड वरील दोन्ही बाजूचे सर्व्हिस रोडवर मोठमोठे खड्डे पडले असून रस्त्यांची अत्यंत दुरवस्था झाली आहे यामुळे याठिकाणी वारंवार अपघात होत असताना ठाणे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष करीत असल्याने अनेक नागरिकांच्या जिवावर बेतत आहे त्यामुळे हे अनोखे आंदोलन करण्यात आल्याचे यावेळी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव आशिष गिरी यांनी सांगितले.