राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेसची गळती सुरुच आहेत. आजही मोठे धक्के बसणार आहे. आज बुधवारी काँग्रेस आणि राष्ट्रवादीतील दिग्गज नेते भाजपात प्रवेश करणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री गणेश नाईक यांचा नगरसेवकांसह भाजपात प्रवेश होणार आहे. तर काँग्रेस नेते हर्षवर्धन पाटील यांचाही भाजप प्रवेश निश्चित झालाय. काँग्रेस नेते कृपाशंकर सिंग यांनी नुकताच पक्षाचा राजीनामा दिल्याने तेही भाजपात बुधवारीच प्रवेश करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
राष्ट्रवादीच्या 55 नगरसेवकांसह गणेश नाईक भाजपात प्रवेश करणार आहेत. नवी मुंबईतील वाशी येथील सिडको एक्झिबिशन सेंटर येथे पक्ष प्रवेश सोहळा होणार आहे. वाशीमध्ये बुधवारी सायंकाळी 5 वाजता गणेश नाईक, संजीव नाईक, 55 नगरसेवक आणि हजारो समर्थकांचा भाजप प्रवेश होईल. या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, रायगड जिल्हा पालकमंत्री रविंद्र गायकवाड आणि भाजपचे इतर मातब्बर नेते हजर राहणार आहेत. या कार्यक्रमासाठी साडे तीन हजार खुर्च्या ठेवण्यात आल्या आहेत.
हर्षवर्धन पाटील यांचाही भाजप प्रवेश
काँग्रेसचे नेते हर्षवर्धन पाटील यांचा दुपारी 3 वाजता पक्ष प्रवेश होईल. यापूर्वीच त्यांनी पुढील भूमिका जाहीर करणार असल्याचं कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात सांगितलं होतं. हर्षवर्धन पाटील यांची राज्यातील सहकार क्षेत्रातील जेष्ठ नेते म्हणून ओळख आहे. इंदापूर विधानसभा मतदारसंघांचे चार वेळा आमदार तर सलग 3 वेळा अपक्ष आमदार म्हणून निवडून येण्याचा विक्रम आहे.
मुख्यमंत्री मनोहर जोशी आणि उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या युती सरकारमध्ये पाच वर्षे मंत्री म्हणून काम केले आहे. नंतर आघाडी सरकारमध्ये 14 वर्षे मंत्री म्हणून काम केले आहे. उत्कृष्ट संसदीय कार्यमंत्री म्हणून तत्कालीन राष्ट्रपतींच्या हस्ते विधीमंडळात गौरव करण्यात आला. इंदापूर विधानसभेच्या जागा वाटपावरून हर्षवर्धन पाटील नाराज होते. इंदापूर विधानसभेची जागा भाजपकडून लढवली जाण्याची शक्यता
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कृपाशंकर सिंग यांनी पक्षाला रामराम ठोकलाय. कृपाशंकर सिंग यांनी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे यांच्याकडे राजीनामा सोपवला. कृपाशंकर सिंग हे भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून आहे. त्यातच या राजीनाम्यामुळे ते भाजपात जाणार हे निश्चित मानलं जातंय.
कृपाशंकर सिंग हे काँग्रेसचे मुंबईतील वरिष्ठ नेते आहेत. उत्तर भारतीयांची मतं काँग्रेसकडे वळवण्यात कृपाशंकर सिंग यांचा वाटा मोलाचा मानला जातो. काँग्रेसच्या सत्ताकाळात 2004 साली कृपाशंकर सिंग हे राज्यमंत्री होते. 2009 साली विधानसभा निवडणुकीत मुंबईत काँग्रेसला चांगलं यश मिळालं होतं. त्याचं बहुतांश श्रेय कृपाशंकर सिंग यांना जातं, असं मानलं जातं. मुंबई काँग्रेसचं अध्यक्षपद, आमदार, राज्यमंत्री, अशी पदं काँग्रेसमध्ये कृपाशं कर सिंग यांनी भूषवली आहेत.
काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेसचे अजून कोणते नेते भाजपाच्या गळाला लागतात याकडे सर्वांच्या नजरा लागलेल्या आहेत. त्यामुळे भाजपाचा मेगाभरती कधी थांबते याचीच चर्चा सर्वत्र जोरदार सुरु आहे.