परळी: गोपीनाथ मुंडे हयात असते तर मीच मुख्यमंत्री झालो असतो. गोपीनाथ मुंडे यांनी कधीही पाठीत खंजीर खुपसण्याचे काम केले नसल्याचे म्हणत भाजप नेतृत्वावर एकनाथ खडसे यांनी शरसंधान साधले.
गोपीनाथ गडावर दिवंगत भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंती दिनी आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यात एकनाथ खडसे बोलत होते. यावेळी आपल्या भाषणात त्यांनी आपल्या मनातील खदखद व्यक्त केली. भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणींना उजाळा दिला.
खडसे म्हणाले, शेटजी-भटजींचा पक्ष अशी ओळख असणाऱ्या भाजपला गोपीनाथ मुंडे यांनी बहुजन समाजाचा पक्ष अशी ओळख मिळवून दिली. गोपीनाथ मुंडे यांनी मोठ्या संघर्षातून भाजपचे महाराष्ट्रात मजबूत स्थान निर्माण केले असल्याचे एकनाथ खडसे यांनी सांगितले. गोपीनाथ मुंडे यांनी कधीही पाठीत खंजीर खुपसण्याचे काम केले नसल्याचे एकनाथ खडसे यांनी म्हटले.
पंकजा मुंडेंचा पराभव झाला नसून घडवून आणला…
पंकजा मुंडे या निवडणुकीत पराभूत झाली याचे दु:ख आहे. मात्र, पंकजा मुंडेंचा पराभव झाला नसून त्यांचा पराभव घडवून आणला असल्याचा आरोप खडसे यांनी केला. आज, गोपिनाथ मुंडे यांची आठवण आल्यानंतर भावूक होतो. आज पुन्हा संघर्षाचा काळ आयुष्यात आला आहे. मात्र, साथ देण्यासाठी गोपिनाथ मुंडेसोबत नाहीत याची खंत वाटत असल्याचे खडसे यांनी सांगितले. माझ्यावर पक्षातल्या लोकांनी आरोप केले. माझी कारकीर्द संपवण्याचा प्रयत्न केला असल्याचेही खडसे यांनी म्हटले.
या मेळाव्याला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे, प्रकाश मेहता, राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर, पाशा पटेल, डॉ. भागवत कराड उपस्थित होते.