मुंबई : नागरिकत्व दुरुस्ती विधेयकावरुन देशात हिंसक वळण लागले आहे. पोलिसांनी जामिया मिल्लीया विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांवर लाठी हल्ला चढविला. त्या कारवाईच्या निषेधार्थ मुंबई विद्यापीठ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद येथे विविध विद्यार्थी संघटनांनी आंदोलनं केली. मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पसमध्येही छात्रभारती आणि इतर विद्यार्थी संघटनांनी जोरदार आंदोलन सुरु केलं. यात शेकडो विद्यार्थी सहभागी झाले होते.
कलिना विद्यापीठात विद्यार्थ्यांकडून एनआरसीला विरोध करण्यात आला. तसेच जामिया विद्यापीठातील पोलिस कारवाईचाही तीव्र निषेध नोंदवण्यात आला. दिल्ली पोलिसांनी विद्यार्थ्यांवर केलेल्या कारवाईच्या निषेधात विद्यार्थ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. देश वाचवा, संविधान वाचवा अशा घोषणाही देण्यात आल्या.
नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्याविरोधात देशभरात विद्यार्थी आक्रमक आंदोलन करत आहेत. जामिया मिलिया विद्यापीठ येथे विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला हिंसक वळण लागलं. त्यात पोलिसांवरच दडपशाहीचा आरोप झाला. त्या पार्श्वभूमीवर आज 16 डिसेंबर देशभरात विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत.
जामिया विद्यापीठामधील विद्यार्थी मारहाण आणि हिंसेवर बोलताना दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेण्यासाठी वेळ मागितला आहे. दुसरीकडे दिल्ली काँग्रेसने पोलिस मुख्यालयावर आंदोलन करत जामियामधील विद्यार्थ्यांच्या मारहाणीचा निषेध केला आहे.
पोलिसांच्या कारवाईची सीबीआय चौकशी करा : प्रियांका गांधी
काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी स्वतः दिल्ली गेटवर आंदोलनाचं नेतृत्व करत आहेत. आंदोलकांनी दिल्ली पोलिसांच्या या कारवाईची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी देखील एनआरसी आणि नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाविरोधात भूमिका घेतली आहे. तसेच पश्चिम बंगालमध्ये नागरिकत्व दुरुस्ती कायदा लागू करणार नसल्याचं म्हटलं आहे.