मुंबई : मुंबई कडाक्याच्या थंडीत १७ व्या टाटा मॅरेथॉन स्पर्धा पार पडली. या स्पर्धोला देशविदेशातील स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. विशेष म्हणजे यंदाच्या स्पर्धेत स्पर्धकांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.
मुंबई मॅरेथॉन मध्ये एलिट प्रकार मधल्या स्पर्धेचा निकाल नुकताच लागला. परदेशीं खेळाडूंमध्ये केनियाच्या हुरीसा याने सर्वप्रथम रेस पूर्ण केली. भारतीय खेळाडूंमध्ये श्रीनु हा विजेता झाला आहे. हाफ मॅरेथॉन महिलामध्ये उत्तर प्रदेशची पारुल चौधरी आणि दुसऱ्या स्थानावर कोल्हापुरची आरती पाटील विजयी झाली आहे. तसंच हाफ मॅरेथॉन पुरुष गटामध्ये हैदराबादचा तीर्थने प्रथम क्रमांक पटकावला आहे.
मानाचा ‘गोल्ड लेबल’ दर्जा मिळवणारी ही मुंबई मॅरेथॉन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपासून पहाटे सव्वापाच वाजता सुरु झाली. देश-विदेशातील नामांकित धावपटूंसह उद्योग जगतातील नामी चेहरे, सिनेकलाकार यात सामिल झाले होते. विजेतेपदासाठी यंदाही केनिया, इथियोपियाचे धावपटू यासाठी प्रबळ दावेदार मानले जात होते.
हा दिला संदेश….
मुंबई मॅरेथॉन टीमने ‘बी बेटर’ या थीमसह, घनकचरा व्यवस्थापनासाठी उचललेले विशेष पाऊल पाहता यंदाची ‘टीएमएम २०२०’नं पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला.
एवढ्या स्पर्धकांनी घेतला सहभाग….
यावेळी स्पर्धेसाठी एकूण ५५ हजार ३२२ धावपटूंनी नोंदणी केली असून यापैकी पूर्ण मॅरेथॉनसाठी ९ हजार ६६० तर अर्ध मॅरेथॉनसाठी १५ हजार २६० धावपटू मैदानात उतरले होते. त्याचसोबत ड्रीमरन साठी १९ हजार ७०७ धावपटू, सिनीअर सिटिझन विभागात १ हजार २२ धावपटू, चॅम्पिअन विथ डिसेबिलिटीमध्ये १ हजार ५९६ धावपटू, ओपन १०केमध्ये ८ हजार ३२ धावपटू तर पोलिस कपमध्ये ४५ संघ सहभागी झाले होते.
असा होता पोलीस बंदोबस्त…
स्पर्धेत मुंबईत पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. यासोबतच दक्षिण, मध्य आणि पोलिसांच्या पश्चिम विभागातील स्थानिक पोलिसांबरोबरच, दोन हजार अतिरिक्त पोलिस, ६०० वाहतूक पोलिस, ३ हजार स्वयंसेवक, ३०० वॉर्डन तसेच राखीव पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला होता.