मुंबई : मतदानाच्या नंतर निवडणूक प्रक्रिया पूर्ण होण्यापूर्वीच EXIT पोल जाहीर करण्याची स्पर्धा वृत्तवाहिन्यांमध्ये लागली होती. सायंकाळी ६ वा. वाहिन्यांनी अंदाज व्यक्त करायला सुरुवात केली. EXIT पोल जाहीरकरणा-या वृत्तवाहिन्यांनी मतदारसंघनिहाय निकाल जाहीर करावा अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे.
सावंत म्हणाले, आकडे वस्तुस्थितीदर्शक नसल्याने जनतेच्या मनात याबाबत प्रचंड रोष आहे. काही वाहिन्यांचे मतदारसंघातील अंदाज हे जनतेला गुरुवारी येऊ घातलेले निकाल याच पद्धतीचे असावेत अशी मानसिकता तयार करण्याकरिता तर जाहीर केले नाहीत ना? अशी शंकाही अनेकांनी व्यक्त केली आहे. त्याचबरोबर सातारच्या नवलेवाडी येथे ईव्हीएम बिघाडाची घटना अत्यंत धक्कादायक असून तिथे प्रत्येक मतदान कमळालाच जात होते हे उघडकीस आले आहे. देशातील प्रत्येक बिघडलेले मतदान यंत्र कमळालाच मतदान कसे देते? हा प्रश्न जनतेला पडला आहे.
ज्या वृत्तवाहिन्यांनी EXIT पोल जाहीर केले आहेत त्यांनी मतदारसंघनिहाय व बुथ निहाय निकाल जाहीर करावेत, वस्तुस्थिती जाणून घेण्याचा अधिकार जनतेला आहे, अशीही मागणी प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस सावंत यांनी केली आहे.