मुंबई: लांबलेला पावसाळा, अधिक प्रमाणात पडलेला अवकाळी पाऊस, वादळी वातावरण यामुळे कांद्याचे पीक यंदा मोठ्या प्रमाणात खराब झाले. यामुळे कांद्याची आवक रोडावून दर हळूहळू वाढू लागले. कांद्याच्या दराने अखेर किरकोळ बाजारात १५० रुपये प्रति किलोचा टप्पा गाठला. यामुळे ग्राहाकांना आर्थिक फटका बसत आहे.
तुर्कीहून कांदा आयात होत असला तरी त्याला विलंब होणार आहे. त्यात कांद्याचा थोडाफार चांगला असलेला जुना माल संपत आला आहे. तर नवीन मालाची आवक फार कमी आहे. यामुळे दर प्रचंड वाढले असून पुढील दहा दिवस तरी त्यात घट होण्याची शक्यता धूसर आहे.
सुरुवातीला सप्टेंबर अखेरीस ४० ते ५० रुपयांदरम्यान असलेला कांदा ऑक्टोबर महिन्यात ६० च्या घरात गेला. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात ८० रुपयांवर असताना अखेरच्या आठवड्यात तो १००-१२० रुपयांच्या घरात गेला. पण आता मात्र कांद्याने १५० रुपये किलोचा टप्पा गाठला आहे.
कांद्याचा जुना माल जवळपास संपला आहे. नवीन कांदा येत असला तरी तो काहीसा ओला आहे. चांगला माल फार कमी आहे. यामुळे दर वधारले आहेत. ही स्थिती पुढील किमान दहा दिवस कायम राहण्याचा अंदाज आहे. मुंबईसाठी वाशीच्या बाजारात दररोज ६० ते ७० वाहन कांदा येतो. पण आता माल संपत आल्याने ही वाहने अर्धी रिकामी आहेत. यामुळे दर वधारले आहेत.
घाऊक बाजारात मागील आठवड्यात कांदा ८० ते ९० रुपये किलो होता. मात्र, आता ग्राहकांना किलोसाठी १५० रुपये मोजावे लागत आहे. त्यामुळे ग्राहाकांना चांगलाच फटका बसत आहे.