मुंबई : सुधारित नागरिकत्व कायदा ( CAA ) लागू झाल्यानंतर या विरोधात देशभरात आंदोलन केलं जात आहे. ईशान्य भारतानंतर राजधानी दिल्लीसह अनेक ठिकाणी आंदोलक रस्त्यांवर उतरले आहेत. आता या कायद्याविरोधात आज १९ डिसेंबर दुपारी ४ वाजता ऑगस्ट क्रांती मैदानात आंदोलन पुकारला आहे.
नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात देशभरात आंदोलन सुरु आहे. मुंबईत होणा-या आंदोलनात अठराहून अधिक विद्यार्थी संघटना एकत्र येऊन मोदी सरकार विरुद्ध आंदोलन करणार आहेत. या आंदोलनात बॉलिवूड कलाकारही सहभागी होणार आहेत. सध्या देशभरात या कायद्याविरोधात जाळपोळ, निदर्शने, धरणे, बंद,या प्रकारचे आंदोलन करुन कायद्याचा विरोध होत आहे. निवेदन सादर करुन कायदा मागे घेण्याची मागणी केली जात आहे. यासाठी नागरिक रस्त्यावर उतरले आहेत.
दररोज विविध शहरांमध्ये आंदोलनाच्या घटना घडत आहेत. दिल्ली, कोलकत्ता, पश्चिम बंगाल, मुंबई, पुणे, औरंगाबाद विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी आंदोलन केली. त्यापाठोपाठ सर्वत्र आंदोलन सुरु झाले आहेत. या आंदोलनामध्ये राजकीय पक्षांनाही निमंत्रण देण्यात आले आहे. या आंदोलनात लेखक, कवी,पत्रकार तसेच विविध संघटना,संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे येथे मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
यापूर्वी रेणुका शहाणे, हुमा खुरेशी, स्वरा भास्कर यांच्यासह फरहान अख्तर, सिद्धार्थ, अनुभव सिन्हा, विकी कौशल, पूजा भट्ट, आलिया भट्ट, परिणीती चोप्रा, अनेक कलाकारांनी नागरिकत्व कायद्याविरोधात भूमिका मांडली आहे. तसेच जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठातील काही विद्यार्थांनी सुधारित नागरिकत्व कायदा मुस्लिम विरोधी आहे, असं म्हणत आंदोलन केले होतं. या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी लाठीहल्ला केला. त्याविरोधात देखील अनेक कलाकारांनी संताप व्यक्त करत ट्विट केले होतं.
कायद्याविरोधात सर्वत्र भडका उडाल्यामुळे देशात अशांतता पसरली आहे. सरकार यामध्ये काय बदलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.