मुंबई : शिवसेनेने २०१४ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपला रोखण्यासाठी राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेससोबत सत्तास्थापण्याचा प्रस्ताव दिला होता असा गौप्यस्फोट माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. यावर बोलताना माजी मुख्यमंत्री विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले पृथ्वीराज चव्हाण यांचा वक्तव्य गांभीर्याने घ्याव लागेल. यातून शिवसेनेचा खरा चेहरा उघडकीस आला. असं टीकास्त्र फडणवीस यांनी सोडलं.
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या विधानामुळे राज्यात राजकीय भूकंप आला आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले शिवसेनेनं जर २०१४ मध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तास्थाण्याचा प्रस्ताव दिला असेल हा विषय गंभीर आहे. “शिवसेनेचं पृथ्वीराज चव्हाण यांच्यासोबत बोलणं झालं असेल पण राष्ट्रवादी काँग्रेससोबत कोणत्याही प्रकारचं बोलणं झालं नव्हतं. काँग्रेस एक वेगळा पक्ष आहे. त्यांना प्रस्ताव आला असावा. पण निश्चितपणे राष्ट्रवादी काँग्रेसला असा कोणताही प्रस्ताव आला नव्हता,” असं नवाब मलिक यांनी सांगितलं आहे. शिवसेनेनं पृथ्वीराज चव्हाण यांचा दावा फेटाळून लावला.
काय म्हणाले होते पृथ्वीराज चव्हाण…
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत २०१४ मधील सरकार स्थापनेबाबत विधान केलं. विरोधी विचारसरणी असतानाही शिवसेनेशी आघाडी करावी, असे काँग्रेसला का वाटले? असे विचारता, चव्हाण यांनी २०१४ मधील राजकीय स्थितीचा दाखल दिला. भाजपाला रोखण्यासाठी आघाडी सरकार स्थापन करण्याच्या दृष्टीने त्यावेळी शिवसेना आणि राष्ट्रवादीने माझ्याकडे संपर्क साधला. मात्र, मी तातडीने हा प्रस्ताव फेटाळला. राजकारणात जय-पराजय असतातच, आम्ही निवडणूक हरल्याने विरोधात बसणार हे त्यावेळी स्पष्ट केले होते. आताही शिवसेनेसोबत सत्ता स्थापण्यास कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी उत्सुक नव्हत्या. मात्र, चर्चेच्या अनेक फेऱ्यांनंतर त्यांनी अनुकूल भूमिका घेतली, असे चव्हाण यांनी सांगितले.
काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या जवळपास ४० आमदारांना पक्ष बदलण्यासाठी धमक्या किंवा आमिषे दाखविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. भाजप-सेनेतील वाद पाहता या परिस्थितीत आम्ही आमची भूमिका बदलण्याचे ठरविले आणि पर्यायी सरकारबाबत विचार सुरु केला. मी यात पुढाकार घेतला, त्यानंतर चर्चा सुरु झाल्याचे पृथ्वीराज चव्हाण यांनी यांनी सांगितले. सरकार कार्यकाळ पूर्ण करणार का, याबाबत पूर्ण हमी कोणीच देऊ शकणार नाही. मात्र, भाजपाने विरोधकांना संपविण्याचा केलेला प्रयत्न आणि शिवसेनेचा केलेला विश्वासघात यामुळे एकत्र आल्याचे चव्हाण यांनी सांगितले.