Placeholder canvas
Friday, April 26, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईजनतेच्या प्रश्नांवर मुख्यमंत्री का बोलत नाहीत? : पृथ्वीराज चव्हाण

जनतेच्या प्रश्नांवर मुख्यमंत्री का बोलत नाहीत? : पृथ्वीराज चव्हाण

Prithviraj Chauhan,Chavan,Prithvirajमुंबई: महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक शेवटच्या टप्प्यात आली आहे पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपचे नेते राज्यातील जनतेच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांवर का बोलत नाहीत असा सवाल करून भाजप शिवसेना सरकारच्या काळात राज्यात एकही नविन प्रकल्प आला नाही अशी घणाघाती टीका राज्याचे माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी सरकारवर केली आहे.
राजीव गांधी भवन येथे पत्रकारपरिषदेला संबोधित करताना पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्य सरकारचे वाभाडे काढले. ते म्हणाले की, ही निवडणूक राज्यातील फडणवीस सरकारच्या पाच वर्षाच्या कामकाजाचे मुल्यमापन करणारी आहे. गेल्या पाच वर्षात त्यांनी राज्यासाठी काय केले याचा हिशोब जनतेला द्यायला हवा पण मुख्यमंत्री मात्र मूल प्रश्नांना बगल देत कलम ३७० आणि काश्मीरबाबत बोलून जनतेची दिशाभूल करत आहेत हे आता लोकांच्या लक्षात आले आहे. भाजप सरकारच्या काळाच देशाची अर्थव्यवस्था चिंताजनक वळणावर पोहोचली आहे. जगातील अनेक निष्पक्ष संस्था अर्थव्यवस्थेची घसरण होत असल्याचे सांगत आहेत. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या अध्यक्षांनी अर्थव्यवस्थेबाबत चिंता व्यक्त केली नेपाळ आणि बांगलादेशच्या अर्थव्यवस्थेचा वेग भारताच्या अर्थव्यवस्थेपेक्षा जास्त राहील असा अंदाज जागतिक बँकेने वर्तवला आहे. यावर उपाययोजना करण्याऐवजी केंद्र सरकारचे मंत्री अर्थव्यस्थेबद्दल बेताल वक्तव्ये करत आहेत हे दुर्देवी आहे.  मंदीचा राज्यातील उद्योगांवर विपरीत परिणाम झाला असून लाखो लोक बेरोजगार होत आहेत मुख्यमंत्र्यांनी त्यावर काही बोलावे असे चव्हाण म्हणाले.
ते पुढे म्हणाले की रिझर्व्ह बॅंकेच्या अहवालानुसार सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये ७३ हजार कोटींचे घोटाळे झाले आहेत. मोदी सरकारच्या काळात बँक घोटाळे सात पटीने वाढले आहेत. पीएमसी घोटाळ्यात ठेवीदारांचे पैसे संकटात आले आहेत. बँकींग नियमाचे उल्लंघन करून एका उद्योगपतीला ७३ टक्के कर्ज वाटप केले तेव्हा राज्याचे आणि केंद्राचे सहकार खाते काय झोपले होते का? घोटाळेबाजांचे सरकारमधील उच्च पदस्थांशी संबंध असल्याचा आरोप करून घोटाळेबाजांची नावे जाहीर करावीत व त्यांच्यावर कारवाई करावी असे चव्हाण म्हणाले.
फडणवीस यांच्या मंत्रीमंडळातील एकनाथ खडसे, विनोद तावडे, प्रकाश मेहता यांच्यावर गंभीर घोटाळ्याचे आरोप आहेत मुख्यमंत्र्यांनी फक्त त्यांचे तिकीट कापले आहे. त्यांच्या घोटाळ्याची चौकशी करून त्यांच्यावर खटले का भरले नाहीत. लोकायुक्तांच्या अहवालात प्रकाश मेहतांवर ठपका ठेवला आहे. मेहतांनी मुख्यमंत्र्यांना अवगत केले आहे असा शेरा लिहिला होता त्याबाबत लोकायुक्तांनी मुख्यमंत्र्यांची चौकशी केली का हे स्पष्ट करावे. व सरकारने चौकशी अहवाल जाहीर करावा. औषध घोटाळ्याच्या चौकशीचे काय झाले? भोसरी एमआयडीसी प्रकरणाचा चौकशी अहवाल जनतेसमोर का ठेवला नाही? मुंबई डीपी प्लान मध्ये १० हजार कोटींचा घोटाळा झाला होता असा आरोप तात्कालीन विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटलांनी केला होता त्यावर मुख्यमंत्र्यांचे काय म्हणणे आहे ते त्यांनी स्पष्ट करावे असे चव्हाण म्हणाले.
मुख्यमंत्र्यांनी दावा केला की महाराष्ट्र शालेय शिक्षणात ३ ऱ्या स्थानावर आहे. पण वस्तुस्थिती ही आहे की ३० सप्टेंबर रोजी नीती आयोगाने प्रकाशित केलेल्या मध्ये महाराष्ट्र ६ व्या स्थानावर घसरला आहे. नीती आयोगाच्या अहवालानुसार राज्यातील आरोग्य सुविधादेखील डबघाईला आली असून संपूर्ण देशात महाराष्ट्रासारख्या “प्रगत” राज्याचा आरोग्य सुविधेच्या बाबतीत १० वा क्रमांक आहे हे महाराष्ट्राचे खरे भीषण वास्तव आहे पण मुख्यमंत्री मात्र खोटे बोलून जनतेची दिशाभूल करत आहेत. जनतेला भाजपचे खरे रूप कळाले असून या निवडणुकीत जनता भाजपला पराभूत करून पुन्हा काँग्रेस आघाडीचे सरकार आणेल असे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments