मुंबई : भाजपाने अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रीपदाच्या फॉर्म्युल्या लेखी स्वरुपात द्यावा, तरच पुढची चर्चा करु तो पर्यंत सरकार स्थापन करणार नाही. असे शिवसेनेच्या बैठकीत ठरवण्यात आले अशी माहिती शिवसेना नेते आमदार प्रताप सरनाईक यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज मातोश्रीवर तातडीच्या बैठकीचं आयोजन केलं होतं. यामध्ये ५०-५० फॉर्म्युल्यानुसार सत्तेचं समसमान वाटा व्हावा यासाठी शिवसेना आमदार आक्रमक झाले आहेत. जवळपास एक तास झालेल्या बैठकीत आता नरमाईची भूमिका नाही. व कोणतीही तडजोड नाही अशीच शिवसेनेने भूमिका घेतली आहे.
भाजपाला १०५ तर शिवसेनेला ५६ जागा मिळाल्या आहेत. शिवसेनेला भाजपासोबत युती केल्यानंतर जागांचा फटका बसला आहे. यामुळेही शिवसेना आक्रमक झाली आहे. भाजपानं लेखी स्वरूपात द्यावं, अशी मागणी आमदारांनी केल्याची माहिती समोर आली आहे. तसेच सत्तेचं समसमान वाटप करण्यात यावं, अशी मागणीही आमदारांनी केली. तसंच सत्ता स्थापनेचे सर्वाधिकार उद्धव ठाकरे यांच्याकडेच असतील, असंही बैठकीत ठरवण्यात आलं आहे. यामुळे भाजपसमोर अडचण निर्माण झाली आहे.