ठाणे । सहायक पोलिस निरीक्षक अश्विनी बिद्रे-गोरे (मूळ रा. आळते, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) यांचे अपहरण करून हत्या केल्याच्या संशयावरून ठाणे ग्रामीण विशेष शाखेचे पोलिस निरीक्षक अभय कुरुंदकर यांना गुरुवारी अटक करण्यात आली होती. नवी मुंबईतील कळंबोली रोडपाली येथून दीड वर्षांपूर्वी अश्विनी बिद्रे बेपत्ता झाल्या आहेत. अभय कुरुंदकर यांना आज पनवेल न्यायालयात हजर करण्यात आले असून त्यांना ७ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
अश्विनी बिद्रे-गोरे बेपत्ता झाल्याची तक्रार त्यांचे पती राजकुमार गोरे यांनी कळंबोली पोलिस ठाण्यात केली होती. मात्र, त्यांचे अपहरण होऊन, हत्या झाल्याचा संशय व्यक्त करत गोरे कुटुंबीयांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. न्यायलयाने याची दखल घेत पोलिसांना प्रत्येक महिन्याला तपासाचा अहवाल देण्याचे आदेश दिले होते.
अश्विनी यांनी बेपत्ता होण्यापूर्वी आजारी रजेवर जात असल्याचा एसएमएस वरिष्ठांना केला होता. त्यामुळे दोन-तीन महिने त्यांच्या विषयी चौकशी करण्यात आली नाही. पण, त्यानंतरही त्या कामावर हजर न झाल्याने त्यांच्याविषयी गूढ वाढले होते. त्यांचे शेवटचे लोकेशन मुंबईत मीरा रोड येथे सापडले होते. न्यायालयाच्या आदेशानंतर पोलिसांनी १२ जणांचे जबाब घेऊन तपास केला. त्यानंतर गुरूवारी सायंकाळी पोलिस निरीक्षक कुरुंदकर यांना अटक करण्यात आली होती.