मुंबई : भाजप शिवसेनेच्या वादामुळे भाजपने सत्ता स्थापनेचा दावा केला नाही. या पार्श्वभूमीवर राज्यपालांनी राज्याच्या अॅटर्नी जनरलसोबत राजभवनात चर्चा केली. अॅटर्नी जनरलच्या सल्ल्यानंतरच राज्यपाल त्यांची भूमिका स्पष्ट करतील. मात्र, शुक्रवार संध्याकाळपर्यंत भाजपने सत्ता स्थापनेचा दावा न केल्यास राज्यात राष्ट्रपती राजवट लागण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.
शनिवारी ९ नोव्हेंबर रोजी तेराव्या विधानसभेचा कार्यकाल संपुष्टात येत आहे. त्याआधीच नवी विधानसभा अस्तित्वात येणं आवश्यक आहे. मात्र सत्तेचा दावा करण्यासाठी अवघा एक दिवस उरलेला असताना भाजपने अद्यापही सत्तेचा दावा केलेला नाही. उद्या संध्याकाळपर्यंत सत्तेचा दावा होणं अपेक्षित आहे. यापार्श्वभूमीवर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी अॅटर्नी जनरल आशुतोष कुंभकोनी यांना सल्लामसलतीसाठी राजभवनावर बोलावलं होतं. कुंभकोनी यांच्यासोबत राजभवनावर राज्यपालांसोबत चर्चा केली आहे.
आज गुरुवारी भाजपचं एक शिष्टमंडळ राज्यपालांना भेटलं. या शिष्टमंडळाने राज्यपालांशी सध्याच्या राजकीय परिस्थितीवर चर्चा केली. सर्वात मोठा पक्ष असूनही भाजपच्या या शिष्टमंडळाने राज्यपालांकडे सत्तेचा दावा केलेला नाही. त्यामुळे राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होण्याची शक्यता वाढली आहे. याक़डे सर्व राजकीय पक्षांचे लक्ष आहे.