मुंबई : युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या निवडणूक लढण्यावर काका आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पहिल्यांदाच भाष्य केलं आहे. आदित्य ठाकरे असो किंवा पुत्र अमित ठाकरे, त्यांना निवडणूक लढवावीशी वाटत असेल, तर त्यात गैर काय? असं म्हणत राज ठाकरेंनी पाठिंबा दिला. यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.
निवडणूक लढवावी की नाही, हे प्रत्येकाचं वैयक्तिक मत आहे. उद्या माझ्या मुलाला निवडणुकीत उतरायचं असेल, आणि तो याबाबत ठाम असेल, तर मी नाही म्हणणार नाही. पण त्याला स्वतःविषयी खात्री वाटत नसेल तर कोण काय करु शकेल? असं राज ठाकरे म्हणाले. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत राज ठाकरे बोलत होते.
‘बाळासाहेब आधीपासूनच व्यंगचित्रकार होते. माझे आजोबा म्हणाले होते, की याला जे जे स्कूल ऑफ आर्ट्सला पाठवू नका, याचा हात खराब होईल. जेव्हा उद्धव किंवा मी जे जे स्कूल ऑफ आर्ट्समध्ये जायचं म्हटलं, तेव्हा त्यांनी नकार नाही दिला. त्यांनी आपली मतं आमच्यावर लादण्याचा कधी प्रयत्न नाही केला.’ हे उदाहरण देत आपल्या पुढच्या पिढीला निवडणूक लढण्याबाबत निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य असल्याचं राज ठाकरे यांनी सांगितलं.
जर आमच्या मुलांना निवडणूक लढवावी असं वाटत असेल, तर आम्ही त्यांना मागे खेचणार नाही. त्यामुळे आदित्यला निवडणूक लढवायची असेल, तर त्यात चूक काय? असं राज ठाकरे म्हणाले. त्य ठाकरे वरळी विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. तिथे आघाडीने उमेदवार दिला असला, तरी मनसेने विरोधात उमेदवार उभा केलेला नाही. ‘हे एक चांगलं कृत्य आहे. तो निवडणूक लढवत असेल, तर त्याच्याविरोधात उमेदवार देता कामा नये, असं मला वाटतं, त्यांना काय वाटतं, हा वेगळा मुद्दा आहे, असंही राज ठाकरे म्हणाले.