मुंबई : शिवसेनेला कोणीही कसलीही ऑफर दिलेली नाही. नव्या ऑफरची वेळ आता निघून गेली आहे. सेल संपलाय,’ असा टोला राऊत यांनी भाजपला हाणला आहे.
भाजपनं शिवसेनेला अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिल्याच्या वृत्ताचं शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी खंडन केलं आहे. भाजपला दूर ठेवून राज्यात सत्ता स्थापन करण्यावर शिवसेना-राष्ट्रवादी व काँग्रेसमध्ये एकमत झालं आहे. तिन्ही पक्षाच्या सत्तावाटपाचा फॉर्म्युलाही ठरला असून आज नवी आघाडी सरकार स्थापनेचा दावा करण्याची शक्यता आहे. हे सगळं सुरू असतानाच भाजपनं शिवसेनेला मुख्यमंत्रीपद देण्याची तयारी दर्शवल्याचं समजतं. गुरुवारी रात्री भाजपकडून ‘मातोश्री’ला तसा प्रस्ताव पाठवण्यात आल्याची बातमी होती. शिवसेना नेते संजय राऊत यांनी मात्र, तात्काळ हे वृत्त आज शुक्रवारी सकाळी पत्रकार परिषदेत खोडून काढलं आहे.
भाजपनं शिवसेनेला सत्तेचा समसमान वाटा न देण्याचा निर्णय घेतल्यामुळे शिवसेनेनं थेट काँग्रेस-राष्ट्रवादीशी घरोबा केला. आता तिन्ही पक्ष सत्तास्थापकरून सरकार बनविण्याची तयारी केली आहे. त्यामुळं भाजपच्या गोटात अस्वस्थता आहे. मुख्यमंत्रिपदाच्या हट्टापायी भाजपनं हातातोंडाशी आलेली सत्ता घालवली, अशी भावना काही आमदारांमध्ये आहे. ही नाराजी दूर करण्यासाठी भाजपनं काल अखेरच्या क्षणी शिवसेनेला नवा प्रस्ताव दिल्याची चर्चा होती. परंतु त्यामध्ये कोणतंही तथ्य नाही. असं शिवसेनेकडून स्पष्ट झालं आहे.