मुंबई : शिवसेना सत्तावाटपाच्या भूमिकेवर ठाम आहे. मातोश्रीवर आज झालेल्या शिवसेनेच्या बैठकीनंतर भाजप सोबत जाण्याचा निर्णय झाली नाही. मात्र, अशा परिस्थितीत आमदारांना फोडण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. या भितीमुळेच शिवसेना आमदारांचा मुक्काम वांद्रे येथील हॉटेल रंगशारदामध्ये असणार आहे.
शिवसेनेच्या बैठकीनंतर शिवसेनेचे सर्व आमदार रंगशारदा हॉटेलमध्ये दाखल झाले. कर्नाटक,गोवा येथे बहुमत सिध्द करण्यासाठी भाजपाकडून आमदारांची फोडाफाडी करण्यात आली होती. त्या भितीने शिवसेना आमदारांना हॉटेल रंगशारदामध्ये थांबवण्यात आले आहे. याठिकाणी तगडा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तसेच शिवसेनेचे शाखा प्रमुखांची या आमदरांवर नजर असणार आहे.
शिवसेनेचे ५६ आमदार तसेच शिवसेनेला पाठिंबा देणारे आठ आमदार असे एकूण ६४ आमदार मातोश्रीहून रंगशारदा येथे गेले आहेत. पुढील आदेश येईपर्यंत वांद्रे येथील या हॉटेलमध्ये हे सर्व आमदार थांबणार आहेत. काळजीवाहू सरकारची मुदत संपण्यास अवघे दोन दिवस शिल्लक आहे. शिवसेना आपल्या भूमिकेवर ठाम असल्यामुळे सध्या सरकार स्थापन करण्याचा पेच कायम असल्याचे दिसून येत आहे.