महत्वाचे…
१.तीन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले २. सावंत यांनी पूर्वीच तक्रार दिली होती तर पोलिसांनी कारवाई का केली नव्हती? ३. खंडणी मागणाऱ्यांना पोलिसांनी वेळीच ताब्यात का घेतले नाही
मुंबई: मुंबईतील कांदिवली समतानगरचे शिवसेनेचे माजी नगरसेवक अशोक सावंत यांची रविवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास धारदार शस्त्राने निघृण हत्या करण्यात आली. सावंत रात्री आपल्या मित्रांना भेटून घरी परतताना त्यांच्यावर हा हल्ला करण्यात आला. इमारतीखाली हे अज्ञात हल्लेखोर गाडीत लपून बसले होते. या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पोलीसांनी तीन जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.खंडणीसाठी त्यांची हत्या झाली असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कांदीवली परिसरात सर्व व्यवहार बंद करण्यात आले असून पोलिस हत्येचा कसून तपास करत आहेत.
सावंत हे रात्री ११ च्या सुमारास आपल्या मित्रांना भेटून घरी परतत असताना त्यांच्यावर हा हल्ला झाला. समतानगरमधील त्यांच्या इमारतीखाली हे हल्लेखोर गाडीत लपून बसले होते. सावंत इमारतीखाली पोहोचताच या अज्ञात हल्लेखोरांनी त्यांना गाठले आणि त्यांच्यावर चॉपरने वार केले अशी माहिती पोलिसांनी दिली. त्यांना उपचारासाठी त्वरीत जवळच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र तत्पूर्वीच सावंत यांचा मृत्यू झाला होता. दरम्यान, इमारतीतील सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने पोलिसांनी हल्लेखोरांचा शोध घेतला जात आहे.
सावंत यांनी काही वर्षांपूर्वी केबलचा व्यवसाय सुरू केला होता. गेल्या काही दिवसांपासून खंडणीसाठी धमक्यांचे फोन येत असल्याची तक्रारही त्यांनी पोलीस ठाण्यात नोंदवली होती. त्यामुळे खंडणीसाठी त्यांची हत्या झाली असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.