ज्येष्ठ भावगीत गायक अरुण दाते यांचं आज पहाटे वृद्धापकाळाने निधन झालं. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. ते ८४ वर्षांचे होते. पहाटे सहा वाजता त्यांनी मुंबईतील कांजूरमार्ग येथील राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. आज दुपारी दोन वाजता मुंबईतील सायन स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहे. मराठी भावसंगीताचा शुक्रतारा निखळल्याची भावना त्यांच्या निधनानंतर व्यक्त होत आहे.
अरुण दाते यांचे वडील रामूभैय्या दाते इंदूरमधील प्रतिष्ठित गायक होते. वडिलांच्या इच्छेनुसार अरुण दाते यांनी गायन क्षेत्रात पाऊल ठेवलं. त्यानंतर १९५५ पासून आकाशवाणीवर गायला सुरुवात केली. वयाच्या पन्नाशीत त्यांनी भावगीतांवर लक्ष केंद्रित केलं. १९६२ मध्ये अरुण दाते यांच्या शुक्रतारा मंदवारा या पहिल्या गीताची ध्वनिमुद्रिका प्रकाशित झाली. ‘शुक्रतारा मंद वारा चांदणे पाण्यातुनी’…’येशील येशील येशील, राणी पहाटे पहाटे येशील’…’भातुकलीच्या खेळामधली राजा आणिक राणी’….’दिवस तुझे हे फुलायचे’…’अखेरचे येतील माझ्या शब्द तेच कानी’…आणि ‘या जगण्यावर या मरण्यावर शतदा प्रेम करावे’…अशा हळुवार आणि सुरेल गीतांनी भावगीतांना नवा आयाम देत त्यांनी दोन पिढ्यांवर अधिराज्य केलं.
अरूण दाते यांच्या बाबत….
@ जन्म – ४ मे १९३४
@ जन्म ठिकाण – इंदूर
@ वडील रामूभैय्या दाते प्रसिद्ध गायक होते
@ कुमार गंधर्वांकडे गाणं शिकले
@ टेक्सटाईल इंजीनिअरिंगचं शिक्षणही पूर्ण केलं
@ काही वर्षं नोकरी केल्यावर पूर्णवेळ गायनाला सुरुवात
@ भावगीतांवर विशेष भर
@१९६२ – ‘शुक्रतारा मंदवारा’ हे पहिलं गाणं
@’शुक्रतारा मंदवारा’ तुफान गाजलं
@ यशवंत देव आणि मंगेश पाडगावकरांसोबत अनेक गाणी
@ आनंद गाणी, शुक्रतारा खंड पहिला आणि अलौकिक गाणी हे अल्बम गाजले
अरूण दाते यांच्या निधनामुळे संगीतातील ‘शुक्रतारा’ निखळला!: विखे पाटील
ज्येष्ठ गायक अरूण दाते यांच्या निधनामुळे संगीत क्षेत्रातील ‘शुक्रतारा’ निखळल्याचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले आहे.
दाते यांच्या निधनावर दुःख व्यक्त करताना विखे पाटील म्हणाले की, अरूण दाते यांनी संगीत क्षेत्रातील आपल्या प्रदीर्घ प्रवासातरसिकांना दिलेला गाण्यांचा गोडवा चिरंतन स्मरणात राहिल. दाते यांनी मराठी भावगीतांमधून स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली होती. त्यांच्या सुमधूर आवाजातील मराठी भावगीतांनी रसिकांच्या ह्रदयात पटकावलेले अढळ स्थान, हीच त्यांच्या संगीत सेवेला मिळालेली खरी दाद आहे. ‘या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे’ असा संदेश देणाऱ्या अरूण दातेंच्या निधनाने संगीत क्षेत्राची मोठी हानी झाल्याचे सांगून विखे पाटील यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.