कोल्हापूर: कोल्हापूर विमानतळावरून होणारे विमानाचे टेक ऑफ पुन्हा एकदा लांबणीवर पडले आहे. केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री अशोक गजपती राजू यांनी दिलेल्या ग्वाहीनुसार १५ डिसेंबर पासून कोल्हापूरमधून प्रवासी विमानाचे टेक ऑफ होण्याची आशा होती.
रनवे (धावपट्टी) दुरुस्तीचे काम आणि विमान उपलब्धतेअभावी विमानसेवेचा प्रारंभ पुन्हा लांबणीवर पडला आहे. गेल्या पाच वर्षांपासून कोल्हापूर ची विमानसेवा बंदच आहे पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी ‘उडान’ योजनेत कोल्हापूरचा समावेश झाला आहे. कोल्हापूर-मुंबई प्रवासी विमानसेवा लवकरच सुरू होईल अशी आशा कोल्हापूरवासीयांना होती.
संबंधित योजनेतील समावेशानंतर वाहतूक परवाना आणि मुंबईतील स्लॉट या कारणास्तव विमानसेवा सुरू होण्यास विलंब होत होता. भारतीय विमानतळ प्राधिकरण आणि नागरी उड्डाण संचालनालय यांच्यातर्फे २५ आणि २६ ऑक्टोबरला कोल्हापूरच्या विमानतळाची पाहणीही करण्यात आली होती. पण सध्याही विमानतळाच्या धावपट्टीचे काम सुरू असल्याने येत्या रविवारपर्यंत कोल्हापूर ची धावपट्टी अधिकृतरीत्या बंद राहणार आहे. या दरम्यान, वातावरण ढगाळ राहिल्यास धावपट्टी बंद राहण्याचा कालावधी वाढण्याचीही शक्यता आहे. त्यामुळे करवीरनगरीतून विमानाचे उड्डाण कधी होणार असा सवाल आता कोल्हापूरकर विचारत आहेत.