मुंबई : हार्बर मार्गावर चार दिवसापासून मेगाब्लॉकने प्रवाशांचे हाल सुरुच आहे. मंगळवारी कार्यालयीन,खासगी कामानिमित्त जाणाऱ्या प्रवाशांना रेल्वे बंदचा फटका बसला. खासगी बसेस,टॅक्सी तसेच जी वाहने मिळेल त्या वाहनांनी प्रवाशांना प्रवास करावा लागला. यामुळे प्रवाशांचे मेगाहाल झाले.
मागील ४ दिवसांपासून हार्बर लाईन वरील पनवेल ते नेरुळ दरम्यान सुरू असलेला मेगा ट्रॅफिक ब्लॉक अद्यापही सुरूच आहे. सीवूड उरण रेल्वेमार्गासाठी हा मेगाब्लॉक घेण्यात आला होता. मंगळवारी प्रवाशांचे हाल सुरुच असून या रेल्वेमार्गाचं काम सुरू आहे. यामुळे प्रवाशांमध्ये रेल्वेप्रशासनाच्या कारभारा बद्दल चिड निर्माण व्यक्त करण्यात येत आहे.
मेगाब्लॉक लांबल्यानं पनवेल आणि नवी मुंबईकरांचे हाल सुरू झालेत. प्रवाशांना नेरूळ किंवा पनवेल गाठण्यासाठी बस हा एकमेव पर्याय आहे. रिक्षाचालक प्रवाशांची लूट करतायत. ज्या बस सोडण्यात आल्यात त्या अपुऱ्या असल्याचं प्रवाशांचं म्हणणं आहे. दरम्यान, सायन पनवेल महामार्गावर कळंबोलीजवळ मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली असून वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळताहेत. पुण्याहून मुंबईच्या दिशेनं येणारी शेकडो वाहनं ट्रॅफिक जॅममध्ये अडकली आहेत. शनिवार, रविवार आणि नाताळ या सलग तीन सुट्ट्या आल्यामुळे मुंबईकर बाहेरगावी गेले होते. याचाही परिणाम वाहतूक दिसून आला होता. सध्याही वाहतूक कोंडीचा प्रवाशांना फटका बसत आहे. तुम्ही सायन-पनवेल मार्गावरून प्रवास करण्याचा विचार करत असाल तर ट्रॅफिकची थोडी माहिती घेऊनच बाहेर पडा. मात्र प्रवाशांचे मेगाहाल कधी संपणार असा प्रश्न उपस्थित होत आहे.