अकोला : ‘रात्रीत लक्ष्मी आली तर येऊ द्यायचं, नाही म्हणायचं नाही’ असा अजब सल्ला काँग्रेस नेत्या, महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी मतदारांना दिला. अकोला जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान मतदारांना मार्गदर्शन करताना ठाकूर बोलत होत्या. यामुळे वाद निर्माण झाला आहे.
त्याविरोधात भाजप नेते किरीट सोमय्या यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. अकोला जिल्हातील पातूर तालुक्यातील आलेगाव जिल्हापरिषद सर्कलमध्ये काँग्रेसच्या उमेदवाराचा प्रचारासाठी नामदार यशोमती ठाकूर आल्या होत्या. त्यावेळी रात्रीची लक्ष्मी घरी येते, तर येऊ द्या तिला नाही म्हणू नका असे यशोमती ठाकूर म्हणाल्या. त्यांच्या या वक्तव्यानंतर मतदारही गोंधळले.
सध्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीची धामधूम अकोला जिल्ह्यात जोमात सुरू आहे. मतदारांना दिलेल्या या सल्ल्याबरोबरच ठाकूर यांनी भाजप आणि मोदींवर सडकून टीका केली. मात्र, त्यांच्या त्या विधानाची जोरदार चर्चा सुरु आहे. भाजपचे केंद्रीय राज्य मंत्री रावसाहेब दानवे यांनीही पूर्वी असा अजब सल्ला दिला होता. तेंव्हाही चर्चा रंगली होती.