नागपूर : भाजपात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस राष्ट्रवादीती आयारांमुळे भाजपातील धुसफूस शमता शमेना. आयारामांमुळे भाजपाचं कल्चर बदलेल, अशी भीती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पुन्हा एकदा व्यक्त केली.
नितीन गडकरी माध्यमाशी बोलताना म्हणाले की, आयारामांमुळे भाजपाचं कल्चर बदलेल अन्यथा त्यांचे कल्चर बदलेल, शेवटी काळाच्या ओघात पक्ष विस्तार करण्यासाठी माणसं जोडावी लागतात. नागपूरमध्ये जेवढे पदाधिकारी आहेत त्यातील ९० टक्के काँग्रेसचे आहेत. काँग्रेस मोठा पक्ष होता. त्यातून ते पक्षात आले त्यांनी पक्षाची संस्कृती स्वीकारली असं म्हणत गडकरींनी पक्षांतर करणाऱ्या नेत्यांवर एका प्रकारे नाराजी व्यक्त केली.
नितीन गडकरी यांनी पहिल्यांदाच अशाप्रकारे विधान केलं असं नाही, तर यापूर्वीही अनेकदा नितीन गडकरींनी पक्षांतर करणाऱ्या नेत्यांना टोला लगावला होता. राज्यातील काही नेते असे असतात जे सत्तेशिवाय राहू शकत नाही, त्यामुळे अनेकदा ही मंडळी सत्ताधारी पक्षात प्रवेश करत असतात. त्यामुळे अशा नेत्यांना लोकांनी धडा शिकविला पाहिजे असं मत गडकरींनी यापूर्वी व्यक्त केलं होतं. नितीन गडकरी यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियातही मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना पाहायला मिळत होते. त्यामुळे गडकरी यांच्या विधानावरून विरोधकांना त्यांच्या पक्षातील पळपूट्या नेत्यांवर टीका करण्यासाठी संधी मिळाली होती.