माजी मुख्यमंत्री भाजपचे खासदार नारायण राणे यांचा महाराष्ट्र स्वाभिमानी पक्ष भाजपात विलिन करण्यात आला. या पार्श्वभूमी शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी राणेंवर घणाघाती टीका केली. राणेंची पार्श्वभूमी दरोडेखोरांची, लुटारूंची आहे. जिल्ह्यात निवडणुकीदरम्यान पडलेले नरबळी हे त्यांचेच पाप आहे, असा खळबळजनक आरोप केला.
मंगळवारी ज्येष्ठ नेते नारायण राणे, त्यांचे सुपुत्र निलेश आणि नितेश राणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत अधिकृतरित्या भाजपामध्ये प्रवेश केला. यापूर्वी नितेश राणे यांनी भाजपाचे सदस्यत्व स्वीकारल्यानंतर त्यांना भाजपाकडून उमेदवारी देण्यात आली होती. नितेश राणे यांच्या विरोधात शिवसेनेनेही आपला उमेदवार उभा केला आहे. त्यामुळे आता या ठिकाणी शिवसेना विरूद्ध भाजपा असाच सामना रंगू लागला आहे.
सिंधुदुर्गातील तिन्ही मतदारसंघांमध्ये शिवसेनेचा विजय होईल. शिवसेना आणि नारायण राणे यांच्यातील वैर संपणं ही अशक्य गोष्ट आहे. बळी दिल्याशिवाय त्यांची निवडणूक पारच पडत नाही. राणेंच्या विकृतीशी आमचा लढा आहे, असं राऊत यावेळी म्हणाले.
नारायण राणे यांनी ज्या पक्षात प्रवेश केला त्यांची अवस्था पाहिली पाहिजे. जे दुसऱ्यांचे पक्ष विसर्जित करण्यास निघाले होते. त्यांचाच पक्ष विसर्जित करण्याची वेळ आली आहे. शिवसेनेवर टीका करण्याची नारायण राणेंची हिंमतच नाही, असंही राऊत यांनी स्पष्ट केलं.