पुणे : महाराष्ट्र विकास आघाडी सरकारनं हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी राज्यातील शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची घोषणा केली. मात्र, या घोषणेनंतर रिपाईचे नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. कर्जमाफी केली पण पैसे कुठून आणणार, सातबारा कोरा का नाही केला, असा सवालही रामदास आठवले यांनी उपस्थित केला आहे.
रामदास आठवले आज रविवारी पुण्यामध्ये पत्रकारांशी बोलत होते. त्यावेळी आठवले म्हणाले, काँग्रेस आणि शिवसेनेत वीर सावरकरांवरून मतभेद आहेत. त्यामुळे त्यांनी वेगळं व्हावं, असा सल्ला देत मंत्रिमंडळ विस्तार कधी? असा सवाल ठाकरे सरकारला केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारने शेतकऱ्यांप्रमाणे मागासवर्गीय महामंडळांची कर्ज माफी करावी, अशी मागणी रामदास आठवले यांनी केली आहे. यासाठी आंदोलन करणार असल्याचाही इशारा त्यांनी यावेळी दिला.
CAA आणि NRC विरोधात गैरसमजातून आंदोलन….
CAA आणि NRC विरोधात गैरसमजातून आंदोलन सुरू आहेत. हा कायदा मुस्लिम विरोधी नाही, त्यांना चिथवण्यात येत आहे. हे आंदोलन दूर्दैवी, मुस्लिमांनी शांतता राखावी, असे आवाहन आठवले यांनी केले आहे.