सातारा : सातारा लोकसभा पोटनिवडणुकीत सर्वांचे लक्ष लागले आहे. यावरून चांगलीच रंगत आली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे दुय्यम फलंदाज आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी कराडला येणार होते. पण त्यांनी दुय्यम फलंदाज पाठवला, अशा शब्दात पृथ्वीराज चव्हाण यांनी अमित शाहांवर टीकास्त्र सोडलं. उदनराजेंच्या पराभवासाठी काँग्रेस आघाडीने कंबर कसली असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे.
कराड दक्षिण मतदारसंघातून पृथ्वीराज चव्हाणांविरोधात भाजपने विलासराव देशमुख यांचे जावई अतुल भोसले यांना तिकीट दिलं आहे. तर साताऱ्यातील पोटनिवडणुकीत उदयनराजेंविरोधात महाआघाडीतर्फे श्रीनिवास पाटील यांना मैदानात उतरवण्यात आलं आहे. या दोन्ही लक्षवेधी लढती चुरशीच्या होणार आहेत.
महाराष्ट्रात येऊन इथल्या प्रश्नावर न बोलता कलम 370 वर बोलणाऱ्या अमित शाहांनी काश्मीरबाबत अभ्यास करावा, असा सल्लाही पृथ्वीराज’ चव्हाण यांनी शाहांना दिला. पंडित नेहरु होते म्हणून काश्मीर भारताचा भाग असल्याचा पुनरुच्चारही त्यांनी केला.
मी लोकसभेचा उमेदवार असतो तरीही आणि आता श्रीनिवास पाटील आहेत तरीही ते दोन लाख मतांनी जिंकणार आहेत. उदयनराजे भोसले पोटनिवडणुकीत दोन लाख मतांनी पराभूत होणार आहेत असा दावा चव्हाणांनी केला. पक्षश्रेष्ठींचा निर्णय म्हणून मी लोकसभा लढलो नाही, असंही पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितलं.