नागपूर: आज सरकारची आर्थिक स्थिती काय आहे? त्याबाबत श्वेतपत्रिका आणण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. ही श्वेत पत्रिका एका तासात निघत नाही. आधीच्या भाजपच्या सरकारने महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचं वाटोळं केलं असा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे.
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे अद्याप पराभव पचवू शकलेले नाहीत त्याचमुळे त्यांनी आज सभागृहात गोंधळ घातला. आज देवेंद्र फडणवीस ज्या पद्धतीने वागले त्यावरुन त्यांना सभागृहाच्या कामकाजात अडथळा आणायचा होता हा त्यांंचा हेतू स्पष्ट आहे. खरं म्हणजे त्यांनी महाराष्ट्राच्या जनतेला सांगितलं पाहिजे की तुम्ही जेव्हा सत्तेत होतात तेव्हा महापूर आला होता. किती नुकसान झालं, काय काय घडलं ते तुम्हाला माहित आहे. केंद्र सरकारला याबाबत तुम्ही पत्रही लिहिलं होतं. परतीच्या पावसामुळे झालेलं नुकसानही तुम्हाला ठाऊक आहे. जर राज्यातल्या शेतकऱ्यांना मदत करायची असेल तर आपण (सत्ताधारी आणि विरोधक) केंद्राकडे जाऊया आणि मदत मागू अशी त्यांची भूमिका असायला हवी होती” असंही चव्हाण यांनी स्पष्ट केलं.
“दुर्दैवाने देवेंद्र फडणवीस यांना त्यांचा पराभव मान्य नाही त्यामुळे ते गोंधळ घालण्याची भूमिका घेत आहेत असाही आरोप चव्हाण यांनी केला. महाराष्ट्राच्या शेतकऱ्याला मदत करण्यासाठी विरोधकांनी सत्ताधाऱ्याची साथ दिली पाहिजे. मात्र आज जे काही घडलं ते अत्यंत अप्रिय आहे. आत्तापर्यंत विधानसभेत मुख्यमंत्र्यांच्या आसनासमोर कुणीही फलक दाखवत नाही, घोषणा करत नाही. मात्र आज देवेंद्र फडणवीस यांनी ते केलं ही बाब निंदनीय आहे” असंही पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं आहे.
आज सभापतींनी सगळ्यांना समज दिली आहे की पुन्हा असा प्रकार घडणार नाही. नव्या सरकारचं हे पहिलं अधिवेशन, त्यातला पहिला तास होता त्यावेळी विरोधकांनी असं वागायला नको होतं असंही पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं आहे. आज सरकारची आर्थिक स्थिती काय आहे? त्याबाबत श्वेतपत्रिका आणण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. ही श्वेत पत्रिका एका तासात निघत नाही असं पृथ्वीराज चव्हाण यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखातीत देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे.