सत्तेचा मलिदा चाखण्यासाठी भाजप – शिवसेनेमध्ये अनेक दिग्गजांनी उड्या मारल्या. युतीच्या जुगाडामध्ये अनेक इच्छुकांना तिकीट मिळाले नाही. त्यामुळे नाराज इच्छुकांनी बंड पुकारला उमेदवारी अर्ज दाखल केला. अशा युतीमधल्या सव्वाशे बंडोबांनी बंड पुकारला आहे. निवडणूक अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस आहे. त्यामुळे किती बंडोबा आपले बंड थंड करतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दोन दिवसापूर्वी मुख्यमंत्र्यांनी बंडोबांना थंड करण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, गिरीष महाजन यांनी बंडोबांना शांत करण्यासाठी कालचा रविवारचा पूर्ण दिवस कामी लावला. बंडखोरांशी या नेत्यांनी मोबाईलवरून संपर्क साधला. अनेक बंडखोरांनी मोबाईल बंद ठेवले होते. त्यामुळे त्यांच्या नातेवाईकांशी, निकटवर्तीयांशी संपर्क साधण्यात आला आहे. ज्या बंडखोरांनी गैरप्रकार केले आहेत, त्याचीही आठवण त्यांना करून दिली जात आहे. बंडखोरांनी आपली तलवार म्यान करावी यासाठी जोरदार प्रयत्न भाजप व शिवसेनेने केले आहेत.
भाजप – शिवसेनेत आयातांची मेगाभरती झाली आहे. पण सगळ्याच आयातांना तिकिटे मिळाली नाहीत. तिकीट न मिळालेल्या आयतांनी अपक्ष अर्ज दाखल केले आहेत. काही ठिकाणी आयातांना तिकीट देण्यात आली. पण या आयातांसाठी विद्यमान आमदारांना तिकिटे नाकारण्यात आली आहेत. अशा विद्यमान आमदारांनी व अन्य इच्छूकांनी अपक्ष अर्ज दाखल केले आहेत. ज्या ठिकाणी शिवसेनेला तिकिट दिले आहे, तिथे भाजपच्या इच्छुकाने बंडखोरी केली आहे. तर ज्या ठिकाणी भाजपला तिकीट दिले आहे, अशा ठिकाणी शिवसेनेच्या इच्छुकाने बंडखोरी केली आहे. विविध कारणांमुळे भाजप – शिवसेनेला बंडखोरीची मोठी लागण झाली आहे. अशा अपक्ष उमेदवारांशी संपर्क साधून त्यांची ‘समजूत’ काढण्यात येत आहे. काही नाराजांनी काँग्रेस – राष्ट्रवादीमध्येही प्रवेश केला आहे.
जवळपास सव्वाशे बंडोबा निवडणुकीच्या रिंगणात असल्यामुळे भाजप – शिवसेनेसमोर मोठी डोकेदुखी निर्माण झाली आहे. विरोधी पक्षाच्या उमेदवारापेक्षा आपल्याच बंडखोरांमुळे पक्षाचा उमेदवार आपटी खाईल याची भीती दोन्ही पक्षांना वाटत आहे. आज अर्ज मागे घेण्याच्या दिवस आहे. शेवटच्या क्षणापर्यंत कितीजण निवडणुकीतून अंग काढून घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.