श्रीहरिकोटा येथील केंद्रावरून २२ जुलै रोजी झेपावलेले चांद्रयान-२ महत्त्वाचे टप्पे पार पाडत चंद्राजवळ पोहोचले आहे. चंद्रापासून अवघ्या ३५ किलोमीटरवर असलेले महत्वकांशी चांद्रयान-२ शनिवारी पहाटे १.३० ते २.३० च्या दरम्यान चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरून इतिहास रचेल. यानाचे लँडिंग झाल्यावर दोन तासांनी म्हणजे ५.३० ते ६.३० च्यादरम्यान विक्रम लँडरमधून प्रग्यान रोव्हर बाहेर पडेल. हा काळ शास्त्रज्ञांसाठी आव्हान ठरणार आहे. सर्वांना त्या क्षणाची सर्वांनाच प्रतिक्षा लागलेली आहे.
श्रीहरीकोटा येथील डीप स्पेस सेंटरमधील अँटिनाद्वारे यानाचे नियंत्रण सुरू आहे. चांद्रयान-२ चे स्वतंत्रपणे भ्रमण सुरू असून शुक्रवारी मध्यरात्रीनंतर चंद्राच्या पृष्ठभागापर्यंतचा त्याचा १५ मिनिटांचा प्रवास चित्तथरारक असेल, असे इस्रोचे अध्यक्ष के. सिवान यांनी म्हटले आहे. इस्रोच्या शास्त्रज्ञांचे मनोबल वाढविण्यासाठी शनिवारी पंतप्रधाननरेंद्र मोदी इस्रोमध्ये उपस्थित राहणार आहेत. पूर्वनियोजित मार्गावरून या यानाने तीन लाख ८४ हजार कि.मी.चे अंतर कापले आहे. विक्रमचा प्रवास प्रतिसेकंद सहा कि.मी. किंवा प्रतितास २१ हजार ६०० कि.मी. असा आहे. त्यानंतर १५ मिनिटांनी विक्रमचा वेग दोन मीटर प्रतिसेकंद राहणे गरजेचे आहे. ही मोहीम यशस्वी झाल्यास चंद्राच्या पृष्ठभागावरील भारताचे हे प्रथमच अवतरण असेल. यापूर्वी चंद्रावर मानव अथवा यंत्र केवळ अमेरिका, रशिया आणि चीननेच उतरविले आहे.
चांद्रयान-२चा आतापर्यंतचा प्रवास सुरळीत होता. पाच महिन्यांपूर्वी इस्राएलने चंद्रावर जाण्याचा प्रयत्न केला होता मात्र तो अयशस्वी ठरला होता, कारण त्यांच्या यानाचा वेग पुरेसा मंदावला नसल्याने ते कोसळले होते.