कोल्हापूर : कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येच्या घटनेला आज पाच वर्षे झाली. या प्रकरणातील आरोपी अद्याप मोकाटच आहेत. पानसरे यांच्या मारेकऱ्यांना महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) लावावा, अशी मागणी डाव्या आघाडीच्या नेत्यांनी गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांच्याकडे केली आहे.
गोविंद पानसरेंवर १६ फेब्रुवारी २०१५ ला झाला होता गोळीबार…
कॉ. गोविंद पानसरे यांच्यावर १६ फेब्रुवारी २०१५ रोजी गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. त्यांचा २० फेब्रुवारी २०१५ रोजी उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. या घटनेला आज, पाच वर्षे पूर्ण झाली आहेत. मात्र, त्यांचे मारेकरी अद्याप मोकाट आहेत. कोल्हापुरात आज, त्यांना आदरांजली वाहण्यात आली. तसंच मॉर्निंग वॉकचं आयोजन करण्यात आलं होतं. तसंच डाव्या आघाडीच्या नेत्यांच्या शिष्टमंडळानं पानसरे हत्या प्रकरणात यंत्रणांच्या तपासावर नाराजी व्यक्त केली आहे. पानसरे यांच्या मारेकऱ्यांना महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) लावा, अशी मागणी शिष्टमंडळाकडून गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांच्याकडे केली आहे.
आठ दिवसांनी घेणार आढावा – सतेज पाटील
पानसरे हत्या प्रकरणाच्या तपासाचा आठ दिवसांनी आढावा घेणार आहे. मारेकऱ्यांचा ४७ पथकांकडून तपास सुरू आहे. तपासासंदर्भात सरकार गंभीर असून, कायदेशीर बाबी तपासण्यात येतील. योग्य दिशेनं तपास करण्यात येईल, असं आश्वासन सतेज पाटील यांनी शिष्टमंडळाला दिलं आहे.