सरकारच्या दबावाखाली विरोधी पक्षांचा आवाज दाबण्याचा दूरदर्शन प्रयत्न करत असून मतदानासाठी आवाहन करण्याच्या काँग्रेसच्या स्क्रिप्टमध्ये परस्पर बदल करण्यात आला आहे. दूरदर्शनचा हा प्रकार संताप आणणारा असून विरोधकांच्या संवैधानिक मतस्वातंत्र्याच्या अधिकारावर गदा आणणारा आहे, असा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे.
सचिन सावंत पुढे म्हणाले की, दूरदर्शनवरील कार्यक्रमासाठी काँग्रेसने एक स्क्रिप्ट दिली होती यात, “गेल्या पाच वर्षात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थापा मारण्याशिवाय आणि खोटे बोलण्याशिवाय काही केलेले नाही”, हे शब्द छाननी समितीने वगळले आहेत. एखाद्या कार्यक्रमात मत व्यक्त करण्याचा विरोधी पक्षांना संवैधानिक अधिकार असून या अधिकारावरच दूरदर्शनने गदा आणली आहे. अशा पद्धतीने विरोधकांना मत व्यक्त करण्यापासून रोखण्याचा प्रकार निषेधार्ह असून दूरदर्शनने काँग्रेसच्या स्क्रिप्टमधून ‘ते’ शब्द का वगळले, तसेच मुख्यमंत्री खरेच बोलतात हे लेखी द्यावे, तोपर्यंत रेकॉर्डिंग करणार नाही.
सरकारच्या कारभारावर टीका करण्यापासून रोखण्याचा अधिकार दूरदर्शनला कोणी दिला? कोणाच्या दबावाखाली दूरदर्शन विरोधकांना मुख्यमंत्र्यांविरोधात बोलण्यापासून रोखत आहे? हे स्पष्ट झाले पाहिजे. दूरदर्शन फक्त सरकारी आवाजाचे व्यासपीठ आहे का? असे प्रश्न उपस्थित करून सावंत म्हणाले की, विरोधी पक्षांच्या टीका करण्याच्या संवैधानिक अधिकारावर गदा आणण्याचा हा प्रकार आम्ही सहन करणार नाही.