मुंबई : सहा महिने पुरेल एवढे अन्नधान्य उपलब्ध असल्याने नागरिकांनी काळजी करू नये. त्यासाठी किराणा दुकानांवर एकाचवेळी गर्दीदेखील करू नये, असे आवाहन अन्न नागरीपुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे.
अन्नधान्य, भाजीपाला किंवा मटण-मासे यांसारख्या जीवनावश्यक वस्तू मिळणारी दुकाने तसेच दवाखाने, मेडिकल आदी सेवा संचारबंदीतून वगळण्यात आल्या आहेत. त्यामुळे यासेवा सुरळीत सुरू राहण्यासाठी प्रशासनाला नागरीकांनी आवश्यक ते सर्व सहकार्य करावे. त्याचप्रमाणे भाजीपाला, कांदा, बटाटा मार्केट बंद केलेले नाहीत. त्या ठिकाणी माथाडी कामगार कामावर जाणार असतील तर त्यासंबंधी पोलिसांनी सारासार विचार करून त्यांना कामावर जाऊ देण्याबाबत निर्णय घेतील. शेतकरी दखील थेट ग्राहकांना भाजीपाला विकू शकतात, परंतू गर्दी होणार नाही याची काळजी घेणे गरजेचे आहे. जीवनावश्यक व अत्यावश्यक वस्तूंचा पुरवठा आवश्यकतेनुसार व सातत्याने सुरू ठेवण्यासाठी पोलीस व सर्व संबंधित यंत्रणांनी कार्यवाही करावी, अशा सूचना संबंधीतांना दिल्या असल्याचेही भुजबळ यांनी सांगितलं.
नागरिकांनी सुद्धा संचारबंदी काळात अनावश्यक बाहेर पडू नये. तसेच जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करण्यासाठी जाताना एकाच व्यक्तिने जावे, संबंधित दुकानांवर जास्त गर्दी होणार नाही याची काळजी देखील नागरिकांनी घ्यावी. नागरिकांनी कोरोना विषाणूची भीती न बाळगता, सतर्कतेने, स्वच्छता ठेवून व एकमेकांपासून लांब राहून या परिस्थितीचा सामना करणे आवश्यक असल्याचेही भुजबळ यांनी म्हटलं आहे.
निर्माण झालेल्या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन सामाजिक संस्थांनी गर्दीच्या ठिकाणी लोकांना ठराविक अंतरावर उभे करणे, निवडक थोड्या प्रमाणात रांगा लावून देणे असे सहज स्वरूपाचे मौलिक सहकार्य केल्यास वातावरण सुरळीत होण्यास मदत होईल.
जीवनावश्यक वस्तू जास्त दराने विकल्यास कारवाई…
किराणा किंवा इतर जीवनावश्यक वस्तू जास्त भावाने विकल्या जाण्याच्या तक्रारी समोर येत आहेत. याबाबत नागरिकांनी जागरूक राहून संबंधित ग्राहक संरक्षण, पोलीस किंवा महसूल अशा यंत्रणांनाकडे त्वरित तक्रार करावी. जीवनावश्यक वस्तूंमध्ये मास्क आणि सॅनिटायझर यांचा देखील समावेश असल्याने यात काळा बाजार झाल्यास सात वर्षांची शिक्षा ठोठावण्यात येईल, असेही भुजबळ यांनी स्पष्ट केले आहे.